Monday, August 7, 2017

प्रसाद पुष्पे - तू वाटचाल चालू ठेव.

प्रसाद पुष्पे - तू वाटचाल चालू ठेव.

कुठेतरी, कधीतरी थांबायला लागणार आहे. अगदी खरे आहे. पण चालत असताना हा विचार कशाला चालू ठेवायचा?

आपण आपले चालत राहावे. भक्तिपंथेची जावे. तो भक्तीचा मार्ग आद्य रामदास मारुतिराय चालून गेले. आदिनाथ, आदिसिद्ध, आदिगुरु शंकर याच मार्गावरचे प्रवासी.

तेव्हा ओघाने आलेले काम मनामधले प्रेम ओतून कौशल्य पणाला लावून करायचे. नाम घेत राहायचे. एकदा का हे मन रामरंगी रंगले की देहाची अवस्था कोणतीही असो!

'अनुसंधाना कधी न चुकवावे'.

यासाठी करायचे काय? श्रवण चुकवायचे नाही. सत्संगाची संधी साधायची. सुमधुर आणि सत्य वचन बोलायचे. हा आपला, हा परका हा भेद मनातून निघून जावा यासाठी इथे तिथे त्या भगवंतालाच पहायला शिकायचे.

म्हणून तर प्रपंचात राहून परमार्थ करायचा. साधना करीत राहिले की अंतरंग, बहिरंग दोन्ही शुद्ध होतील.

समर्थांचे दोन श्लोक सर्व भाव ओतून म्हणू या.

सदासर्वदा योग तूझा घडावा। तुझे कारणी देह माझा पडावा।उपेक्षू नको गूणवंता अनंता। रघूनायका मागणे हेचि आता।।

उपासनेला दृढ चालवावे। भूदेव संतांसि सदा लवावे। सत्कर्मयोगे वय घालवावे। सर्वामुखी मंगल बोलवावे।।

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले.

No comments:

Post a Comment