Sunday, August 6, 2017

प्रसाद पुष्पे - शिशुपण बरवे हृदया वाटे.

प्रसाद पुष्पे - शिशुपण बरवे हृदया वाटे.

ज्या रंगांच्या काचांचा चष्मा आपण घालू त्या रंगाचे जग आपल्याला दिसणार. म्हणजे जग असायचे तसेच असते पण आपल्या मनातल्यासारखे ते आपल्याला भासते.

कोणाविषयी आपल्या मनात अढी असली, मन कलुषित असले की त्या व्यक्तीचे सत्कृत्य आपल्याला कौतुकास्पद नाही वाटत.

सगळे जग आपल्याला हसरे, नाचरे, विविध रंगी असे वाटायला हवे.  वृक्षवल्लरी, वनचरे आपली सोयरी धायरी व्हायला पाहिजेत. तर मग सृष्टीशी जवळीक साधू या.  माती पाणी, उजेड, वारा, आकाश यांचे हे जग. आपल्या देहाचे ही घटक नेमके तेच.

खेळावे जरा मातीत, करावे बागकाम शेती, प्यावे झऱ्याचे थंड मधुर पाणी, घ्यावे जरा ऊन अंगावर, सोसावा थोडा झोंबरा वारा. जगायला मनाचे का होईना बालपण चांगले. किती उशिरा कळते पण हे!

संतसाहित्य मनाच्या मशागतीला फार चांगले, बालकवींच्या कविता गाव्यात, उत्तमोत्तम ठिकाणे पहावीत, रात्री अभाळातलं चांदणं पहावे, देवाला स्मरावे आणि त्याला म्हणावे, तू जे दिलेस ते घेण्याला हे हात दुबळे ठरतात, तरी तुला माझा नमस्कार.

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment