Saturday, June 15, 2024

नाम येता मुखावाटे, देहबुद्धी कमी होते!

नाम येता मुखावाटे, देहबुद्धी कमी होते!ध्रु.

देह नव्हेच आपण -
सुखदुःखे ही कोठून? 
मग प्रारब्धाचे भोग भोगता न काही वाटे!१

नाम अमोघ साधन 
नाम दिव्य संजीवन 
जेथे नाम तेथे राम हे तो प्रत्ययास येते!२

नाम आहे पराभक्ती 
नाम मनासी विश्रांती 
नाम जपता जपता कली-सत्ता नष्ट होते!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराजांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १९ म्हणजे १९ जानेवारीचे प्रवचनावर आधारित हे काव्य.

बहुतेक लोक प्रारब्ध टळावे म्हणून नाम घेतात.  प्रारब्धाची गती फक्त देहापुरतीच असते;  म्हणून, ज्याची देहबुद्धी कमी झाली तो देहाच्या सुखदु:खाने सुखी वा दु:खी होत नाही. नामाने देहबुद्धी कमी होते. म्हणून, नामात राहणारा मनुष्य प्रारब्धाचे भोग भोगीत असताना देखील आनंदात असतो. अखंड नामात जगणे यालाच पराभक्ती म्हणतात. देहबुद्धी कमी होणे हेच पुण्य होय, आणि ते नामाने प्राप्त होते. नामाने कलीची सत्ता नाहीशी होते. वाईट किंवा विषयाच्या वासनेने बुद्धी भ्रष्ट करणे हेच कलीचे मुख्य लक्षण होय.  देह प्रारब्धावर टाकून, आणि आपण त्याहून निराळे राहून, जे होईल त्यात आनंद मानावा. भोग प्रारब्धाने येतात असे म्हणण्यापेक्षा ते भगवंताच्या इच्छेने येतात असे म्हटले की समाधान मिळेल.

No comments:

Post a Comment