Wednesday, December 13, 2017

शुभमंगल सावधान!



शुभमंगल सावधान!

शुभमंगल सावधान। शुभमंगल सावधान!ध्रु.

युवकाचे युवतीशी
युवतीचे युवकाशी
नाते ये आज जुळुन!१

धर्म, अर्थ, काम यात
निष्ठा ही जपत सतत
चलत रहा गात गान!२

सातत्यहि वंशाचे
वरदानच हे श्रींचे
श्रवण मनन करी सुजाण!३

द्वंद्व दिसे, तरिहि नसे
सावध तो कधि न फसे
सोsहंचे सहज स्मरण!४

साधुनिया तो मुहूर्त
अंत:पट दूर होत
आत्म्याचे घ्या दर्शन!५

कौटुंबिक मधुजीवन
विसरवते माझेपण
अद्वयत्व ये उमलुन!६

नरनारी उभय हरी
सप्तपदी बोध करी
संसारी सुखद जाण!७

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Sunday, December 10, 2017

नांदा सौख्यभरे..



नांदा सौख्यभरे

समाज सांगे वधूवरांनो नांदा सौख्यभरे !ध्रु.

दोन जीव हे कोण कोठले एकत्रित झाले
देवघेव बघण्या हसण्याची वदनी स्मित फुलले
हार करातील दोघांच्याही आतुरलेत खरे!१

आश्वासन श्वसनातुन लाभे नावाला पडदा
हृत्स्पंदन छे सतारीच या गाताती दिडदा
माना डुलती, मनगटातले हासतात गजरे!२

शुभ चिंतावे, शुभ बोलावे मंगल होत असे
शुभ ऐकावे, शुभच घडावे प्रसाद लाभतसे
वृद्धांचे घ्या शुभाषीश हो आपण भावभरे!३

वत्सलतेसह सामाजिकता संयम सुखकारी
संस्कारांनी साधा आपण पुरुषार्थहि चारी
विवाहबंधन पाळताच या जन्मी मुक्त खरे!४

दूर करा पट, मी तू गेले, उरले एकपण
शब्द संपले उरले सुस्मित मौनातुन भाषण
संगीताने, संवादाने सदन करा साजिरे!५

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.

सप्तपदी!



सप्तपदी

हाती घालुनि हात तुजसवे चालत असताना
सात पावले ही शिकवती सुरेख ओनामा! ध्रु. 

जुळवुनि घ्यायाचे तोल मग सहज साधताहे
मंजुळ बोलांनी मनाला मोद होत आहे
सुखदच अनुभव हा लाभतो सहजच उभयांना!१

कायेला काया कैसी श्रीहरिची माया
मने गुंतण्याला घातला भरभक्कम पाया
शिकायचा नित्य प्रपंची अपुला एकपणा!२

दृष्टी आत वळवू दिसशी तू माझ्यामध्ये
मी तर केव्हाची राहिले येउन तुजमध्ये
तू मी सरलेले आपण भरु या उणेपणा!३

जोडीची गोडी वाढते इथे संयमाने
बंध स्मरताना मोक्ष ये हाती सहजपणे
हातचे न राखू बोलू वागू जगताना!४

विश्वासावरती चालतो दोघांचा श्वास 
गाठ बांधलेली आहे साक्ष विवाहास
सवंगडी रंगे कसा हा खेळ खेळताना!५

विशाल मन बनता सासर झाले माहेर
भेद न उरला तो आत जे उमटे बाहेर
जन्म नवा रुचतो समंजस नकळत होताना!६

असो नसो कोणी मानता अनंत अस्तित्व
प्रपंच रामाचा कळो ये हे मोठे तत्त्व
परमार्थहि साधे रोजची कामे करताना!७

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Saturday, December 9, 2017

मी पुसता तुज




मी पुसता तुज

मी पुसता तुज होशिल का मम
नयन भूवरी खिळले
सखि मज तुझे मनोगत कळले !ध्रु.

खुले कपोली प्रणयरक्तिमा
नयनी दिसे तव रम्य नीलिमा
बघता लाजुन जाई चंद्रमा
पदराशी चाळा चाले !१

प्रणयभाव वसत मनि या
रोमांचे हो पुलकित काया
गूढ भावना व्यक्त कराया
तुझे अधर थरथरले ! २

हातामध्ये हात गुंफुनी
मूकभावना नयनि आणुनी
यौवनाचिया रम्य उपवनी
हो शुभमंगल अपुले ! ३

- श्रीराम बाळकृष्ण आठवले
१९५५

Wednesday, December 6, 2017

कर्तृत्वे ठरला भीम!

जो नामे होता भीम
कर्तृत्वे ठरला भीम !ध्रु.

अस्मिता जागली पोटी
मग गूढ स्मित ये ओठी
मनि राष्ट्रभक्ती निःसीम!१

हा योद्ध्यांचाही योद्धा
आवडला अंती बुद्धा
गहिवरला योगी भीम!२

आघात घणाचे साहे
मेरूहुन अविचल राहे
आदर्श पहा परिपूर्ण!३

ही जात मनातुन जावी
समतेची वार्ता यावी
कटुतेला नुरले स्थान !४

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Thursday, November 30, 2017

श्रीगीतामृत नवनीत.

श्री गीतामृत नवनीत

भ्याला अर्जुन? मुळीच नाही भ्रमजाळी तो गुरफटला
धर्म कळेना कर्म घडेना शस्त्र टाकुनी हिरमुसला ! १

मरणालागी भिणे कशाला मृत्यु कुणाला टळलेला?
देहांतर स्वाभाविक मनुजा ज्ञानी ना कधी घाबरला ! २

आपण आपुले कर्म करावे मनापासूनी ही भक्ती
कर्मि कुशलता साधकास दे आत्मबलाची श्रीमंती ! ३

संयमनाने निजप्रयत्ने नैतिक उन्नति साधावी
अंकित जे मन दे हित साधुन घडी कारणी लावावी ! ४

निजकर्तव्या करता करता ज्ञानातहि भर घालावी
ज्ञाने लाभत शांति मनाला समता हळु हळु साधावी ! ५

ज्ञानी कर्म नि कर्मी ज्ञान जाणताच हे जाणतसे
तोल मनाचा भक्त हरीचा योगी रमुनि राखतसे ! ६

नामाचा रथ ध्यानाचा पथ पुढे पुढे तुज जाण्याचे
सारे सात्त्विक भाव उमलता दर्शन होईल कृष्णाचे ! ७

गीतामुरली कानी यावी अंतरातुनी गोपाला
सोsहं सुस्वर भूपाळीचे जागविती मनि देवाला ! ८

योगाभ्यासे आवरले मन विनीत जेथे होत असे
तेथे स्वमने अपणा बघता आत्मरूप ते विश्व दिसे ! ९

अतींद्रियचि सुख हे अनुभविता तत्त्वच्युत ना नर होतो
लाभ कायसा याहुन दुसरा? योगी नारायण बनतो ! १०

साधनेत जरि शरीर गेले चिंता येथे कोणाला?
उत्साहाचे अमृत प्यालो कृपा तुझी रे गोपाला ! ११

मरणभयाला नाशायाला गीता आहे अवतरली
भक्ति शिकवते ज्ञान मुरवते सत्कर्मा प्रेरक ठरली ! १२

कृष्णार्पण जो कर्मे करतो पापपुण्य त्या लागत ना
मन झाले गंगाजळ निर्मळ अपार श्रीहरिची करुणा ! १३

पान फूल वा पाणी दिधले आवडले बहु आवडले
भाविक भक्ता बघता बघता मानस माझे परिमळले ! १४

परमात्म्याचे चिंतन करता सहज साधते समरसता
ध्याता ध्याता श्रीभगवंता विरताती सगळ्या चिंता ! १५

चुकलो त्याची खंत कशाला सुधारण्याचा ध्यास धरी
शुभसंस्कारे येत शुद्धता गुण मिळविण्या यत्न करी ! १६ 

स्वरूपबोधावरती येउन निर्मम निर्भय मी व्हावे
शक्तिस्फूर्ति प्रताप यांचा प्रपात मज बनता यावे ! १७

अंत:स्थित बल ते ऊर्जस्वल अंतरास या जाणवता
पूर्णत्वाच्या आविष्कारे जीवनही होई कविता ! १८

अंतरिच्या शक्तीच्या शोधे देही दिसताहे देव
साधक जपतो सदैव हृदयी सद्भावाची ही ठेव ! १९

सेवेचा आनंद आगळा जनी जनार्दन पाहु या
माणुसकीचा मंत्र आळवित शिवास पूजत राहू या ! २०

देव असे सकलांच्या हृदयी पाया आहे गीतेचा
मंदिर कर्माने रचलेले कळस चढविला भक्तीचा ! २१ 

कृष्णाईची धरुनि अंगुली आनंदाने चालावे
अंगुलि सुटता “आई, आई” ऐसे म्हणुनी क्रंदावे ! २२

स्वभाव तैसे कर्म घडतसे सत्त्वगुण मनी वाढ़ू दे
उदात्त उन्नत होवो मानस जनी जनार्दन पाहू दे ! २३

सत्त्वगुणांची वृद्धी घडता सुख येई हासत दारी
विवेक दावी वाट सरळ ती आदेशा त्या अवधारी ! २४

संवादातुनि सुख झुळझुळते प्राशावे या कानांनी
स्फूर्ति लाभते जीवन फुलते अज्ञानी होतो ज्ञानी ! २५

श्लोक जरी एकेक वाचला जीवन अवघे बदलेल
मांगल्याचा गंध आगळा कृतीकृतीला येईल ! २६

ध्यानाचा त्या ध्यास धरावा अभ्यासाची या गोडी
हलके हलके अनुभविता मग सहजच उलगडती कोडी ! २७

गुण चिंतावे आनंदावे चैतन्याचा वास तिथे
वस्तु व्यक्ती यांच्या उगमी ईश्वरीय शक्ती वसते ! २८

आत्मसंयमन शुद्ध आचरण गुणवैभव हे जोडावे
मनने ध्याने उपासनेने विश्वात्मक भक्ते व्हावे ! २९

आत्मिक आनंदाच्या पुढती तुच्छ तुच्छ ते उपभोग
दु:खातहि जर ढळे न शांति मन:स्थिती ऐसी योग ! ३०

तत्त्वची अवतरले भूवरती कृष्णाच्या या रुपाने
कर्माचरणे जगा दाविले शिष्योत्तम श्रीपार्थाने ! ३१

गीतामृतनवनीत त्वा दिले कृपावंत सद्गुरुराया
कृतार्थ झालो मी गहिवरलो पुलकित झाली मम काया ! ३२

गायक श्रोते समरस झाले चैतन्याचा अनुभव हा
श्रीरामाचे मानस सांगे तत्त्वपालना सिद्ध राहा ! ३३

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Saturday, November 25, 2017

मनि भरले हे पावस गाव..



पावस गाव, पावस गाव
मनि भरले हे पावस गाव ! ध्रु. 

श्रीगुरु वसती भक्तांसाठी
माउलीपरी करती प्रीती
भवाब्धिपतिता होती नाव ! १

क्षेत्र भूवरी अती मनोहर
अतीव सुखकर पापतापहर
दुःखाला नच जेथे वाव ! २

इथे वनश्री नटली थटली
इथे साधका दिसे वाटुली
घेई मनाचा लवकर ठाव! ३

निर्मल वाहे तटिनी येथे
ये पावनता माहेराते
म्हणुनि चित्त घे येथे धाव! ४

अध्यात्माचा स्वर्ग नांदतो
आत्मानंदी यती रंगतो
जेथे उसळत भक्तीभाव! ५

ध्यानाला कधी खंड पडेना
विकल्पास मनि वाव उरेना
कुवासनांते करि मज्जाव! ६

निर्वातीचा दीपु न हाले
सोsहं  सोsहं चिंतन चाले
देहमंदिरी दिसला राव! ७

आम्ही अमुचे भाव न उरती
तुम्ही तुमचे भाव उमलती
नाथपंथिचे उजळत नाव! ८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१९७३

Tuesday, November 7, 2017

श्रीगणपतीचा पोवाडा.



अरे शाहिरा थाप डफावर कडाडून तू ठेवुन दे
गणपतिबाप्पाचा पोवाडा रंगभूमिवर रंगू दे! ध्रु.

झोपी गेला समाज सारा खडबडून तो जागावा
राष्ट्रधर्म तो तव कवनातून मनामनावर बिंबावा
पुराण कसले इतिहासच हा युक्तीने तू पटवून दे !१

गणेश आहे बलसागर हा गुणसागरही तैसा तो
श्रोता लेखक तैसा योद्धा  त्याच्यासम नेताही तो
गणितावरचे प्रभुत्व त्याचे विद्यार्थ्यांना जागू दे!२

अंकुश म्हणजे मना टोचणी पाश इंद्रिया जिंकाया
कमल सुगंधी सुंदर तैसे, मोदक मोदा वितराया
यज्ञोपवितहि रुळे तनूवर सामवेद त्या ऐकू दे!३

गायत्रीचा मंत्र जपावा, बलोपासना चालावी
डरायचे ना कधी कुणाला, विघ्ना भीक न घालावी
डावावर प्रतिडाव कसा तो निवेदन तुझे सांगू दे!४

तिथी चतुर्थी स्फूर्तिप्रद तो विनायकी वा संकष्टी
अथर्वशीर्षाचे आवर्तन दीपज्योतच तेवत ती
स्थैर्य धैर्य ते सामंजस्यहि सदा सर्वदा लाभू दे! ५

अबला साऱ्या झाल्या प्रबला युद्धकला त्यांना येते
गण गणनाथा शिस्तबद्ध तर विनायका रे तव फत्ते
यशासारखे बक्षिस दुसरे नसते ध्यानी येऊ दे! ६

या देशाची घटना कैसी, विविधतेत एकता कशी
जरी वाटलो वेगवेगळे तरी साखळी दृढ कैसी
गणराज्याचा जयजय साऱ्या त्रैलोक्यी तो दुमदुमु दे! ७

उत्तर दक्षिण पूर्व नि पश्चिम गणरायाचा जयजयकार
लहान मोठ्या भेदा विसरुन जनता व्हावी एकाकार
विधायकाचा धडा विनायक सकलां घालुन देऊ दे ! ८

मंगलमूर्ती ज्याची कीर्ती आत्मशक्ति तो जागवतो
केला जरि का पोत खालती अग्नी वरती उफाळतो
अन्यायाची चीड मनातुनि ज्वालामुखिसम पेटू दे! ९

स्वराज्य म्हणजे काय शिकव तू लोकशाहिरा गंभीरा
प्रसन्न झाला गणेश तुजवर प्रभावशाली तुझी गिरा
गदिमांसम तुज लेखनसिद्धी या जन्मातच लाभू दे! १०

कडाडता डफ झांज झणझणे  बाहू श्रोत्यांचे स्फुरती
उत्साहाचे उसळे वादळ निराशेस द्या मुठमाती
अशक्य शब्दच नाही कोशी कर्तृत्वे हे दावुन दे! ११

गजराजाची कशी भव्यता डोळे दिपवी सांघिकता
धाकाहहुनही सत्कर्माला प्रेरक प्रेमाची सत्ता
साक्षरता व्यसनातुन सुटका धमाल यांची उडवून दे! १२

शेती उद्यम व्यापारातही हवी सचोटी जनतेची
गरज पडतसे तिथे घडावी धाव चपळ त्या चरणांची
सामाजिकता ती समरसता सवयीची होऊ दे! १३

इथे असावे असुनि नसावे अलिप्तपण ते सुखदायी
कर्मफलाची आसच नसता सेवा घडणे पुण्याई
श्री गजानन जय गजानन असे वैखरी गाऊ दे! १४

देह असे पाचा भूतांचा गणेशमूर्ती दाखवते
जैसा येतो तैसा जातो दहा दिसांतच जाणवते
जो आला त्या जावे लागे खंत कधी ना वाटू दे! १५

मधुर वागणे मधुर बोलणे, मधुरच भाषा भक्ताची
मधुर पाहणे, मधुर चालणे खूण गणपतीदासाची
आरतीतला ओलावा तो गाता गाता अनुभवु दे! १६

भक्तीमधला आवेशहि तो जीवनयुद्धी प्रकटावा
वीररसाचा औदार्याचा शांतीचाही स्पर्श हवा
पोवाड्यातहि भाव रोकडा रसिकमनाला जिंकू दे! १७

गणपति छात्रांचा, वीरांचा, तरुणांचा अन प्रौढांचा
गणपति होता जसा कालचा, तसा आजचा पुढिलांचा
भाषण चिंतन वर्तन यांची एकरूपता साधू दे! १८

चित्रकलेचा विषय गणपती मूर्तिकलेचा ध्यासच तो
ओंकाराची तोच आकृती योगिजनांचा योगी तो
पुढती मागे गणेश आहे धीर अधीरा लाभू दे! १९

वगात गण तो अभंग भजनी, ज्ञानेशाच्या ओवीत
रंगभूमिवर, रणभूमीवर, शाळेमधल्या वर्गात
तन्मय होणे गणेशपूजन सहजच हाते घडवू दे! २०

कवीस लिहिता केले त्याने शाहीरा ना राहवते
साथीदारा चढे स्फुरण तुणतुणेहि कैसे तुणतुणते
श्रीरामाचे भाग्य आगळे अश्रू होउन हासू दे ! २१

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, October 31, 2017

अशी व्हावी सहजच एकादशी.



अशी व्हावी सहजच एकादशी

देहच देहू तुकया आत्मा गात्रे इंद्रायणी
आळंदी मन, ज्ञाना आई, घे मज उचलूनी
ती पाजत प्रेमाचा पान्हा काय उणे मजशी?
अशी व्हावी सहजच एकादशी ! १

मायबाप विठ्ठल रखुमाई धरता ती पाउले
आज्ञापालन हातुन घडता विठ्ठल घरी आले
पुंडलिकास्तव सान विटेवर तिष्ठे हृषिकेशी
अशी व्हावी सहजच एकादशी ! २

हरिपाठाची गोडी लागे, रुजते मनि ओवी
अभंगवाणी श्रीतुकयाची हरि वेणू वाजवी
विवेक सद्गुरु अंतरी वसुनी मजला उपदेशी
अशी व्हावी सहजच एकादशी ! ३

नकोस शिणवू काया वाया, नको दूर तुज जाण्या येण्या
बोरे चाखी, सेवी पोहे, कृष्ण चापतो कण्यावर कण्या
भक्तिभाव भर सांभाळुन धर माथ्यावर कळशी
अशी व्हावी सहजच एकादशी ! ४

तू जे करशी कल्याणाचे श्रद्धा दृढ राहो
सबुरी होवो मज सवयीची देह भले जावो
स्वरूप आनंदाने न्यावे मज पवनाशी
अशी व्हावी सहजच एकादशी ! ५

राम कृष्ण हरि, ज्ञानबा तुकाराम गजर पडो कानी
भानुदास एकनाथ पैठणहुन ये मृदुल मधुर वाणी
भागवताचे निमित्त करुनी कधी हृदयी धरशी
अशी व्हावी सहजच एकादशी ! ६

मी कर्ता हा नकोच ताठा पाण्यासम व्हावे
पाट काढुनी वाट दिली त्या दिशेनेच जावे
हे जगदीशा वनराईतुन फुलांतुनी हसशी
अशी व्हावी सहजच एकादशी ! ७

मन कोणाचे नच दुखवावे पथ्या पाळावे
परस्परांशी मधुर भाषणे मैत्र जुळुन यावे
तो मी तू ही मुळात एकच गिरवु पाठाशी
अशी व्हावी सहजच एकादशी ! ८

भाजी भाकर सेवन केली व्रत नच मोडेल
पचायला जड टाळावे कोठे बिघडेल
गावकऱ्यांनी प्रेमभराने कराव्यात चौकशी
अशी व्हावी सहजच एकादशी ! ९

प्रश्न विचारुन शंका फिटती समाधान होते
कारण येते शोधाया मग रहस्य उलगडते
समजावुन ते द्यावे जे जे कळते आपणासी
अशी व्हावी सहजच एकादशी ! १०

देशी भाषा वेषहि देशी चालरीत देशी
प्रचलित सगळ्या प्रांतांमध्ये असे कधी करशी
रामराज्य भूवरती नांदे दिसु दे सगळ्यांशी
अशी व्हावी सहजच एकादशी ! ११

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, October 22, 2017

नास्तिक.



देवा तुज जन नित्य प्रार्थिती
कोणी तव प्रतिमांना पुजिती
मला मात्र निष्क्रीय बघोनि
जन म्हणति मज 'नास्तिक' नास्तिक' ।।१।।

मला न मूर्तिपुजा आवडे
बाह्याचरणी मम मन न रमे
मी तुज चिंतित असे मनीं पण
जन म्हणती मज 'नास्तिक' नास्तिक' ।।२।।

बाह्यात्कारी तव स्तुति करुनि
हृदयि भयानक द्वेष धरुनि
राक्षस जगि या आस्तिक ठरती
जन म्हणती मज 'नास्तिक' 'नास्तिक'।।३।।

दगडामघ्ये देव असे का?
आकाशामधिं नित्य वसे का?
सर्वाभूतीं ईश्वर बघता
जन म्हणती मज 'नास्तिक' नास्तिक' ।।४।।

पुरुनी टाका द्वेष भावना
सारे जग हे एक कल्पना
उरी बाळगा असे सांगता
जन म्हणती मज 'नास्तिक' नास्तिक' ।।५।।

- श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७ जानेवारी १९५५

Saturday, October 21, 2017

ओवाळणी



सांग भगिनी! घालू तुजला कोणती ओवाळणी?
लाडका भाऊ तुझा मी पातलो गावाहुनी।।ध्रु.।।

गगन किती हे उंच आहे, येतसे का मोजतां
रत्नाकराची भव्यता येईल कोणा वर्णितां
माया तुझी तैशी मला बोलुं ना देते अता
मूक माझ्या भावना या दाटु बघती लोचनी!१

ताई, मजसाठिच तू गे देह अपुला झिजविला
प्रेमरस पाजुनी तू मज सुस्वभावी बनविला
तुजपुढे मी सान मूर्ति काय देऊ मी तुला?
वाटते ऐसे मला, व्हावे न मी कधि अनृणी!२

तेल उटणे लावुनि गे न्हाउ घालि तू मला
होउ दे अजि मज फिरूनी बंधु तुझा सानुला
बाळपणचा सोहळा तो फिरुनि लाभो आजला
भेट परि गे अल्पशी तू गोड घेई मानुनी!३

- श्रीराम बाळकृष्ण आठवले
   ७ ऑगस्ट १९५५

Thursday, October 19, 2017

एवढे दान दे आता....



एवढे दान दे आता
ते प्रेम शिकव भगवंता! ध्रु.

मन दुसऱ्याशी समरस व्हावे
परदु:खाने व्याकुळ व्हावे
लाजविण्या नवनीता!१

जनहितार्थ मी नित्य झटावे
उदात्त उन्नत मानस व्हावे
आतुर नित परमार्था!२

अपराधाचे स्मरण नुरावे
सोसायाला बळ लाभावे
क्षमाशील कर आता!३

अंतरातला विवेक जागव
कुविचारांचा कचरा घालव
केरसुणी दे भक्ता!४

नैराश्याचे नकोच वादळ
पूर्वग्रहांचे काळे बादल
हटवी बघता बघता!५

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.

लक्ष्मीमाते...

लक्ष्मीमाते....

लक्ष्मीमाते प्रसन्न होई
दे दे दे वरदान मला!
शांति सुखाचा अक्षय ठेवा
तशी सन्मती देइ मला! ध्रु.

नको द्रव्य मज कष्ट न करता
आलस्याची नकोच वार्ता
जी लागे दुर्बलाकारणी
शक्तिसंपदा देइ मला!१

या देहाचा विसर पडावा
खरा देव ओळखता यावा
जरी दरिद्री मज नारायण -
दिसो, दृष्टि देई विमला!२

श्रद्धा वैभव प्रल्हादाचे
निश्चयबळ ते बालध्रुवाचे
अज्ञानाच्या तमातुनी ने
प्रकाशाकडे जगताला!३

सदाचार हे सोने आहे
सद्विचार हे भूषण आहे
सात्त्विकता सौन्दर्य खरे ते
ती श्रीमंती देइ मला!४

- श्रीराम बाळकृष्ण आठवले
(१९८५ सालची रचना)
लक्ष्मीमाते..
 👆🏻 ऑडिओ

Sunday, October 8, 2017

प्रसाद पुष्पे - समर्थांचे काव्य! अनुभवाचा विषय !

समर्थांचे काव्य! अनुभवाचा विषय !

त्यांची तळमळ, मनाचा प्रांजळपणा, भावनांचा खळाळता प्रवाह, ओजो गुण, प्रासादिकता स्तिमित करून सोडतात.

श्रीरामचंद्रा करुणासमुद्रा! ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा
नेत्री न ये रे तुजवीण निद्रा! कैं भेटसीबा मजला सुभद्रा

श्रीरामाचा वियोग किती असह्य झाला पाहा.

शिवराय छत्रपती झाले.  हिंदवी स्वराज्य स्थापन झाले तो आनंद कसा ओसंडतो पहा

बुडाला औरंग्या पापी, म्लेंच्छ संहार जाहला
उदंड जाहले पाणी, स्नानसंध्या करावया

आपल्या संपूर्ण काव्यामधून समर्थ आपल्या मनाचे आरस्पानी दर्शन घडवितात, आत्मारामाशी सुखसंवाद करतात, चालता बोलता दासबोध करतात आणि मनाची बाहेरची धाव थांबवून त्याला आत वळवून अनंत राघवाचा अनंत मार्ग चालून जाण्यासाठी मनोबोध रचतात.

करुणाष्टके, विविध देवांच्या आरत्या लिहाव्या समर्थांनीच.

रामदासांनी श्रीरामचंद्राला समर्थ म्हणून गौरविले - जय जय रघुवीर समर्थ! तर जनतेला हा रामाचा दासच समर्थ वाटला.  स्वामी वाटला.

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

प्रसाद पुष्पे - आधी बीज एकले

प्रसाद पुष्पे - आधी बीज एकले

संतांची जर कृपा असली तर साहित्यिक त्या संतचरित्राशी - संतसाहित्याशी इतके एकरूप होतात की त्यांच्या साहित्याला अभंगत्व प्राप्त होते.

'आधी बीज एकले' ही कै. शांताराम आठवले यांची काव्यरचना!

अभ्यासकांनी तुकाराम महाराजांच्या गाथेत शोध शोध शोधले पण मौज अशी 'तुका म्हणे ' अशी मुद्रा त्या रचनेत नाहीच.

दिसणारे भासणारे सर्व त्या अनंताचेच रूप

आधी बीज एकले। बीज अंकुरले,  रोप वाढले
एका बीजापोटी। तरु कोटि कोटि।
कोटि जन्म घेती। सुमने फळे।
व्यापुनि जगता। तूही अनंता
बहुविध रूपे घेशी। परि अंती ब्रह्म एकले
आधी बीज एकले।

केशवराव भोळे यांचे संगीत आणि पागनीसांचा अभिनय व स्वर.

ती समरसता मला अच्युता
कधी एकदा देशिल का?
देणे घेणे सरले सगळे
मने मोकळा होईन का?


- श्रीराम बाळकृष्ण आठवले


Tuesday, October 3, 2017

कसे जगावे?




कसे जगावे?

कसे जगावे? प्रश्न तुला का अवघड हा पडला
निसर्ग निरखुन पहा मानवा प्रश्न कसा सुटला

बीज स्वतःला दडपून घेई आधी मातीत
मेघ बरसतो नकळत वरती अंकुर येतात
फुलाफळांनी झाड लहडते सुगंध दरवळला

गुण दुसऱ्याचे जगा कथावे वारा हे शिकवी
ओला वारा, गंधित वारा तप्त जनां सुखवी
खुल्या मनाने करी स्वागता कण कण मोहरला

आकाशाचे छत्र शिरावर दूर दूर पसरे
आसऱ्यास जे येती कोणी घे जवळी सारे
मी सगळ्यांचा, सगळे माझे पाठ न का शिकला

ही धरती आधार देतसे सोसत राहे किती
अंगावरती भले विपत्ती येऊ द्याव्या किती
धीर न सोडी ठाम ठाक तू ती शिकवी तुजला

पाणी कैसे तहान शमवी ते तर झुळझुळते
जे जवळी ते जनांस द्यावे जीवन रसरसते
तू सगळ्यांशी वाग सारखा वृत्तीने मोकळा

कुणी निंदु दे कुणी वंदु दे सोड न माणुसकी
देवाशी रे ऐसी आहे सुंदर बांधिलकी
गीता ऐसे जगण्या शिकवी जो शिकला तरला

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

कशाला जगावे?





कशाला जगावे?

भगवंताने तुज पाठविले 'कार्य' करायाला
काय करू मी? कोण बनू मी? करी निर्णयाला!

'जोवर जीवन, हासत जगणे' शिकून घे मंत्र
फूल कसे वेलीवर डुलते शिकून घे तंत्र
सुगंध अपुला जगी उधळते सुखवी सकलाला

तू नच जगशी, श्रीहरि जगवी तो मोठी आई
हरि हरि जप रे तीच बालका आहे अंगाई
थकवा सरतो अनुसंधानी भजनी हरि भरला

तुझे कार्य ही श्रीहरि सेवा ते कसले कष्ट
जीवन आता ओझे नाही कर्मयज्ञ स्पष्ट
तव कर्माची पवित्र समिधा दे दे यज्ञाला

'मीपण' म्हणजे केवळ ओझे भिरकावुन दे ते
शिशुपण बरवे हृदया वाटे मनने ते मिळते
बाळ लाडका तू देवाचा ओळख अपणाला

तुझे कर्म ही सुंदर संधी देवाने दिधली
सफल होतसे आनंदयात्रा जर खेळीमेळी
उत्साहाने पार्थ कसा बघ कर्मा भिडलेला

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

Monday, October 2, 2017

प्रसाद पुष्पे - काळ; भगवंताचे रूप!

प्रसाद पुष्पे - काळ ; भगवंताचे रूप!

कालोsस्मि लोकक्षयकृत् प्रवृध्द:
असे भगवंतानेच म्हटले आहे.
अत्यंत चकित होऊन माडगूळकर विठ्ठलाला म्हणतात -

तूच घडविशी, तूच फोडिशी
कुरवाळिशी तू, तूच ताडशी
न कळे यातुन काय जोडशी
मुखी कुणाच्या पडते लोणी
कुणा मुखी अंगार!
विठ्ठला तू वेडा कुंभार!

काळ जात असतो का मनुष्य काळाकडे खेचला जात असतो?

कालगती अगदी अनाकलनीय आहे. त्याला नमस्कार करणे एवढेच आपल्या हाती आहे.

काळ दुःख विसरायलाही मदत करतो.

कालाय तस्मै नमः!

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

प्रसाद पुष्पे - २ ऑक्टोबर! गांधी जयंती!

प्रसाद पुष्पे - २ ऑक्टोबर! गांधी जयंती!

२ ऑक्टोबर! गांधी जयंतीचा दिवस! सत्य, अहिंसा, शांती या सद्भावांचा पुजारी! जगाने महात्मा म्हणून गौरवलेला माणूस!

विशेषत: दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांच्या हातून घडलेले कार्य अद्भुतच म्हणावे लागेल. सामान्य जनतेला निर्भय बनविले. खादीच्या प्रचारासाठी चरख्याचा प्रचार केला. सत्याचे प्रयोग केले आणि लिहिलेही.

"हिंदुस्थानची फाळणी" हे शल्य त्यांना शेवटपर्यंत आतून बाहेरून टोचतच राहिले. महाकाव्याच्या नायकाला शोभावे असे मरण त्यांना आले तेही प्रार्थना सभेला जात असताना!

पवित्र आचरण, सत्याचा आग्रह, स्त्रियांच्या आत्मबलाची जागृती, खेड्यात चला हा संदेश, शिक्षण पद्धतीबद्दल संशोधन, अनेक क्षेत्रात त्यांच्या चिंतनाची मौलिकता जाणवते.

आत्मशुद्धीसाठी त्यांनी केलेली उपोषणे त्यांच्या प्रमाणिकतेची साक्ष देतात.

दुर्दैव हे की गांधीजींसारखे महापुरुष त्यांच्या अनुयायांना कळलेच नाहीत.

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Sunday, October 1, 2017

प्रसाद पुष्पे - त्रिगुणांचा हा खेळ चालला.

प्रसाद पुष्पे - त्रिगुणांचा हा खेळ चालला.

तमोगुणाचे वैशिष्ट्यच हे की माणूस मोहाने आंधळा होतो - विकारवश होऊन त्याचा अधःपात होतो. सगळे त्याची कीव करतात. जगात छी:थू होते.

मातीत खेळायचा स्वभाव जाता जात नाही. अंग आणि अंगाबरोबर मनही मलीन होते याची जाण नाही. किती पुटांवर पुटं चढतात.

ती जाण कोणी करून दिली तरच एखाद्या भाग्याच्या क्षणी पश्चात्ताप होऊन पुनर्जन्म व्हायचा.  वाल्याच्या जीवनात तो क्षण आला, खडतर तप केले आणि महाकवी वाल्मीकी बनला.

मध्ये तिष्ठन्ति राजसा:।

आपण बहुधा मधल्या दर्जाचे असू अशी समजूत करून घ्यायची आपण, आणि उर्ध्वम् गच्छंति सत्त्वस्था:।

नामस्मरण, सद्ग्रंथ श्रवण, ध्यान यांची गोडी मनाला लावून घ्यावी. अभिरुची चांगली होईल आणि चिखलात लोळणे नकळतच बंद होईल.

गीता वाचा, स्वतःची योग्यता जाणा, वाढवा. त्यातले विचार आत्मसात करा आणि श्रीकृष्णाचे खरेखुरे भक्त होऊन ध्येयासाठी सुखदुःखांचे आघात सहन करीत दिव्य जीवन जगा.

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Friday, September 29, 2017

प्रसाद पुष्पे - 'दासबोध' घ्या हाती.

प्रसाद पुष्पे - 'दासबोध' घ्या हाती.

ग्रंथा नाम दासबोध। गुरुशिष्यांचा संवाद। येथ बोलिला विशद। भक्तिमार्ग।।

ग्रंथराज दासबोधामधील ही पहिलीच ओवी! इथे आरंभाला नमन नाही पण श्रोत्याच्या-वाचकाच्या मनाची पकड घेणारी तोंडओळख जरूर आहे.

समर्थांचे बोलणे रोखठोक! आत्मप्रत्ययाचे! ग्रंथाचे नाव, ग्रंथाचे स्वरूप, ग्रंथाचा विषय यांचा उल्लेख अवघ्या एकाच ओवीत.

मना सज्जना भक्तिपंथेचि जावे
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे

हे मनाचे श्लोक वाचावे आणि लगेच दासबोधाचा आश्रय घ्यावा.

भक्तिचेनि योगे देव। निश्चये पावती मानव ऐसा आहे अभिप्राव। ईये ग्रंथी।।

मग आपल्याला तरी अधिक काय हवे?

श्रवणाला श्रावण महिना फारच चांगला! डोळे मिटावेत. शिवथरघळीत मनानेच बसावे. त्यातील ओव्या समर्थ आणि सच्छिष्य कल्याण या दोघांच्या स्वरात मनानेच ऐकाव्या. आत्मारामाची भेट घडावी आणि सहज साधना घडता घडता विदेहीपणे सर्व काया निवावी!

समर्था आम्हाला आपल्या चरणी बसवा आणि दासबोधाच्या द्वारे आमच्याशी बोला ना!

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.

प्रसाद पुष्पे - प्रथम करू या विचार पुरता.

प्रसाद पुष्पे - प्रथम करू या विचार पुरता.

पूजाअर्चा, नामजप, सद्ग्रंथ वाचन यात आपला वेळ फार जातो असे आपल्याला वाटते का? या गोष्टी मनापासून होत नाहीत याची खंत आपल्याला वाटते का? व्यवहारात वावरताना एवढ्या तेवढ्या कारणाने आपल्या मनाचा तोल ढळतो का?

वरील प्रश्नांची उत्तरे आपल्या मनाशी द्यावी आणि मग आपण आपला योग्य विचार करावा.

आजार ओढवतो, छोट्या अपघाताने परस्वाधीन होण्याची पाळी येते तेव्हा आपले वर्तन कसे घडते? भगवंताला उद्देशून अपशब्द नाही ना उच्चारत?

मूर्तीमधील दिव्यत्व मूर्तिपूजेशिवाय नाही कळणार. गणपत्यथर्वशीर्ष, श्रीरामरक्षा स्तोत्र, श्री व्यंकटेश स्तोत्र यांचे पाठ सावकाश झाल्याशिवाय अर्थ आत कसा रिघेल? देवाने आपल्याला उपासनेला बसविले आहे. नवनवीन अर्थ चिंतनातून जाणवून देण्याचे काम तोच अंतःकरणात बसून करवून घेतो असे का नाही समजू?

व्यवहारातली रुक्षता, औपचारिकपणा जाण्यासाठी संतांचा सहवास नित्याचा हवा. त्यासाठी अभंग गायचे, नामजप करायचा, मंदिरात जायचे, ध्यानाला बसायचे. तुम्ही करत असलेली देवपूजा लोकांनी बघत राहावे अशी व्हावी.

चला तर आधी आपला आड भावभक्तीने भरून घ्यायला लागू या म्हणजे मग वेळोवेळी पोहराही भरत जाईल.

हेतू शुद्ध बाळगला तर कृती चांगली होईल.

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

प्रसाद पुष्पे - जागे व्हा, जागे!

प्रसाद पुष्पे - जागे व्हा, जागे!

देहबुद्धी ही निद्रा! आत्मबुद्धी ही जागृती!

विशेषतः रविवारी किंवा अन्य सुट्टीच्या दिवशी अंथरुणावरून उठूच नये, लोळत पडावे असे वाटते. हा मोह झुगारून हात पाय तोंड धुवून देवाला नमस्कार केला की जागृती यायला लागते.

व्यवहार कुणाला सुटला आहे? तो करावाच लागतो आणि सवयीने तो घडतही जातो.

वाद लगेच होतात, निंदा लगेच सुरू होते, खाण्या पिण्याचा अनावर मोह लगेच होतो. परिणामी आपलीच हानी!

आतला देव पहाटे उठून पहावा, ऐकावा. आता हे जे मी लिहीत आहे ते तो सांगतो आणि मी लिहितो. यात स्फुरण त्याचेच आहे. माझे भाग्य की लेखणीवाटे शब्द कागदावर उतरतात.

हं ते जगाला शहाणे करून सोडण्यासाठी वगैरे म्हणणे माझीच फसवणूक करून घेणे आहे. खुद्द मीच जसे लिहितो, बोलतो, गातो तसे मला बनले पाहिजे.

अभ्यासासाठी आपल्याला न येणाऱ्या गोष्टी शिकून घ्याव्यात. अभ्यासासाठी कधीही, कुठेही मुद्रा प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा. वातावरण निर्मिती साठी बोलण्यात गोडवा, खेळकरपणा आणावा.

देवा, तूच मला पहाटे आणलेली जाग आयुष्यभर टिकव! श्रीराम!

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

प्रसाद पुष्पे - नको वासना हेमधामी..

प्रसाद पुष्पे - नको वासना हेमधामी..

जरा फुरसत मिळाली की काय करावेसे वाटते? फक्कडसा चहा प्यावा, सिगारेटचा झुरका घ्यावा, का अजून काही? आतून उसळणारी उर्मी कोणती?

विवेकाने त्या उर्मीवर मात करायची आहे.

मनानेच मनाला शिकवायचे आहे. आयुष्याचा क्षण नि क्षण सार्थकी लावायचा आहे. आपली उपभोगाची लालसा नष्ट करायची आहे. म्हणायचे आहे -
मना वासना वासुदेवी वसू दे!

आजवर स्वतः करताच राब राब राबलो आपण! फार तर अगदी जवळच्या नातेवाईकांचा विचार केला!

विहिरीतल्या बेडकाला जग विहिरीएवढेच वाटते. आपण स्वतःच म्हणू या "कुपातील मी नच मंडूक".

स्वराज्य म्हणजे आत्म्याचे राज्य! रामाचे राज्य! आपला आपण निर्णय घेऊन तसे वागण्याचा पूर्ण अधिकार!

हा अधिकार देवदत्त आहे. मग भगीरथ प्रयत्नाने आपण पूर्वग्रहांवर, विकारांवर मात करू या.

नामस्मरण करून मन शुद्ध करु या. आपले भवितव्य आपण घडवू या. हातून साधना घडू लागली, गीता कळू-वळू लागली म्हणजे आपणच असे म्हणू-

भवितव्य दिव्य माझे माझ्या मुठीत आहे -
झेलावया प्रहारा सामर्थ्य अंगी आहे!

जर जन्म सार्थकी लावायचा असेल तर तटस्थपणे आपणच आपणाला पाहून भावना, विचार आणि त्याद्वारे आचार, सदाचार घडवायचा आहे.

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Sunday, September 17, 2017

प्रसाद पुष्पे - चंद्र सूर्य!

प्रसाद पुष्पे - चंद्र सूर्य!

श्री ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ आणि श्री समर्थ रामदासांचा मनोबोध! एवढे दोन ग्रंथ देखील पाठांतराला, मननाला, जीवनभर जगण्यासाठी प्रेरणा घेण्याला पुरणार आहेत.

हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा
पुण्याची गणना कोण करी?
हे वारंवार मनावर ठसविले जाते.

"भावेविण भक्ती बोलू नये" "हरिसी न भजसी कवण्या गुणे" - असे काही सुटसुटीत चरण बहिर्मुख व्यक्तीला अंतर्मुख करतात.

'मनाचे श्लोक' देखील नास्तिकाला आस्तिक बनविण्यास फार चांगले.

केवळ लहान मुलांनीच पाठ करण्यासाठी नव्हेत तर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांनी मनोबोध मोरावळ्यासारखा आवडीने चाखावा, अंगी मुरवावा. धक्के चपेटे सोसण्याचे सामर्थ्य स्वप्रयत्नाने मिळवावे.

सकाळी सकाळी अर्धा पाऊण तास होतील तितके श्लोक म्हणावेत, काही ओळी चिंतनास घ्याव्या आणि भोजनोत्तर निद्रेपूर्वी हरिपाठाची संगत धरावी.

सूर्य चंद्र यांचेच काम हे दोन छोटे ग्रंथ उरलेले आयुष्यभर करीत राहतील असा विश्वास वाटतो.

या दोन्ही ग्रंथांतून गीतादर्शन घडते, नव्हे का?

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.

प्रसाद पुष्पे - लाज, संकोच, भीड, मर्यादा

प्रसाद पुष्पे - लाज, संकोच, भीड, मर्यादा

लाज, संकोच, भीड, मर्यादा! एकापाठी एक हे शब्द सुचत गेले! लिहूनही बसलो. पण यांचा एकमेकांशी आणि मानवी जीवनाशी संबंध काय आणि कोणत्या प्रकारचा?

आपले बहुतेकांचे चुकते कोठे?

आपण लाजायला हवे तिथे लाजत नाही, नको तिथे लाजतो. देवाचे नाम घ्यायला, देवळात जायला, संध्या करायला लाज वाटते. पण नको ते पाहायला, ऐकायला, बोलायला आणि निंदा करायला लाजत नाही. लज्जा हे केवळ स्त्रीचेच भूषण नाही, पुरुषांचेही आहे.

परकेपणाची भावना संकोच निर्माण करते. पण मग बोलायचे ते राहून जाते. चुटपुट वाटते. सुरवातीला सुदम्याला  श्रीकृष्णाला भेटायचा संकोच वाटत होता. पुढे जाऊ की परतू मागे असे झाले पण श्रीकृष्ण उच्चासन सोडून सुदाम्याकडे धावत गेला व त्याने त्याला कवेत घेतले.

लोक काय म्हणतील असे सारखे वाटणे म्हणजे भीड. यालाच आपण म्हणूया जनलज्जा. ती भीडच एकदा सुटली की गाडी लागली उताराला.

शिमगा सण खरं तर सांगतो शिव गा! पण आपण होलिकोत्सवाचा अगदी शिमगा करून टाकला.

मर्यादशील स्वभाव असणे व्यक्तीच्या दृष्टीने कल्याणाचे. आपण कोण, कुटुंबातले आपले स्थान कोणते, आपण नेमके काय केले पाहिजे या सगळ्याची जाणीव म्हणजे मर्यादेची जाण.

श्रीरामापुढे भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न यांनी आपली मर्यादा जाणली. मर्यादा हा धरबंध आहे. तो सुटता कामा नये.

माणसाचे मनुष्यत्व लज्जेत आहे. भीड वाटली म्हणजे वाटेल तसे वर्तन घडत नाही.

पण आई आणि मूल, देव आणि भक्त ,  पती आणि पत्नी यांचे परस्पर संबंध कसे असतात.

ते सांगायलाच हवे का?

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.

प्रसाद पुष्पे - गमू पंथ आनंत या राघवाचा.

प्रसाद पुष्पे - गमू पंथ आनंत या राघवाचा.

काय करावे? झोपच येत नाही पुन्हा. ठीक आहे, येत नसेल तर न येवो बापडी. हात पाय धुवू. देहाची सवय म्हणून चहा करून पिऊ या. पण नंतर? या मनाला काही सवय लावायला हवी का नको?  समर्थ जसे म्हणाले आपणही निवांत वेळी त्याला सांगू या -

मना सज्जना भक्तिपंथेची जावे!

आपला श्वास - तो घेणे, उच्छ्वास टाकणे आपले आपल्याला ऐकू येईल इतकी शांतता आहे. जग थांबलेले नाही. अधूनमधून रस्त्यातील वाहनांचा आवाज येतच आहे कानावर!

पण ज्या अर्थी आज भगवंताने लवकर जाग आणली त्याअर्थी तो काही शिकवणार आहे आपल्याला.

प्रभाते मनी राम चिंतीत जावा!

रामाचे चिंतन! म्हणजे त्याच्या चरित्राचे अवलोकन! रामाच्या सद्गुणांचे स्मरण! रामनामसंकीर्तन!

नामसंकीर्तन साधन पै सोपे
जळतिल पापे जन्मांतरिची!

इतर वेळी हे वचन  आठवले असते का आपल्याला?
बाहेरच्या जगाकडे लक्ष पुन्हापुन्हा जात असले तरी त्या धावणाऱ्या मनाला आतल्या जगाकडे लक्ष द्यायला लावायचे. म्हणून तर नाम घ्यायचे.

मना उलटता होते नाम! श्रीराम जयराम जय जयराम!

काळजी काळजाला कुरतडते, संशय वाढवते, भीतीचे निराशेचे साम्राज्य पसरते.

त्याच क्षणी हात जोडून भगवंताला विनवायचे -

तमसो मा ज्योतिर्गमय! मला अंधारातून प्रकाशाकडे ने.

केशवसुतांची सतारीचे बोल कविता वाचली असेल ना? तम अल्प, द्युति बहु असे सतारीच्या दीड् दा दीड् दा ने शिकवले.

विधायक विचार शांत करतात, रचनात्मक कार्य करण्याची प्रेरणा देतात. विघातक विचार विनाशाकडेच नेतात.

आपण सावध राहिले पाहिजे.

उतरणीवरून गडगडत खाली जाणे सोपे आहे. पण नेट धरून डोंगराची अवघड चढण चढणे आव्हान आहे.

ते आव्हानच पेलू या.

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

प्रसाद पुष्पे - थोडं सोसायला शिकू या!

प्रसाद पुष्पे - थोडं सोसायला शिकू या!

अत्यंत उकडतंय, घामाच्या धारा लागल्यात. विजेचा पंखा स्वतः तापून फिरत आहे पण त्याचा वारा तलखी नाही शांत करू शकत. पण पंखा बंद करून पहा काय होतंय ते.

गंमत आहे नाही! ऋतुचक्र असेच फिरले, फिरत आहे, फिरत राहणार. माठातले पाणी एखादा घोटच प्यावे पण नाही राहवत. थंडगार सरबत प्यावे वाटणार, आईस क्रीम चालेल ना! किती चोचले पुरवतो आपण या देहाचे!

मुद्दाम उन्हात उभे रहावे असे नाही म्हणत कोणी. पण दुर्लक्ष करायला शिकावं, अखंड नामस्मरण चालू ठेवलं, संतवचनांवर चिंतन करीत गेलं की मन उंच उंच जाऊन पोचतं. वातावरणच बदलून जातं सारं.

अंदमान मधे तुरुंगात स्वातंत्र्यवीर कसे राहिले असतील? त्यांना नव्हतं उकडत? त्यांना नव्हते डास चावत? कोलू फिरवावा लागत होता ना?

मंडालेमध्ये लोकमान्य कसे राहात होते?

निसर्गाशी जेवढी जवळीक साधावी तेवढी साधत नाही आपण. झाडे लावतो का? बागकाम करतो का? थंड पाण्याने स्नान करतो का?  न लाजता मोठ्याने देवाचे म्हणतो का? शिवमंदिरात जाऊन गाभाऱ्यात पिंडीजवळ बसून शिवस्मरण करतो का?

असं केल्यास चोचले आपोआप कमी होतील आणि थोडं सोसायला ही शिकता येईल.

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, September 12, 2017

प्रसाद पुष्पे - विवेक दे, वैराग्य दे.

प्रसाद पुष्पे - विवेक दे, वैराग्य दे.

आवड असली की सवड सापडते. विषयाची आवड लावावी नाही लागत. त्याची चटक माणसाचा चट्टामट्टा करते. तेव्हा बरे वाईट पारखून निवड करावी आणि आवड नसेल तर ती निर्माण करावी म्हणजे सवड सापडतेच.

पूजा, ध्यान, नामस्मरण, सद्ग्रंथ श्रवण यांची आवड लावून घ्यावी लागते.

नशापाणी केव्हाही वर्ज्यच.

परंतु अंती देहाचाही विसर पडायला लावणारी भक्ती - ईश्वर प्राप्तीचा ध्यास - ही गोष्ट ज्याला लाभली तो आनंद डोहात बुडाला आणि असा जो बुडला तोच तरला.

नारदभक्ती स्तोत्राचा अभ्यास यासाठी करावा.  गोंदवलेकर महाराजांची प्रवचने यासाठी कुटुंबियांनी एकत्र बसून वाचावीत. जपाची एक माळ तरी दिवसाकाठी व्हावी.

शिक्षणात एक महत्त्वाचे सूत्र आहे. एकाग्रता हे यशाचे बीज आहे.

एका रामावाचून आता मला दुसरे प्राप्तव्य नाही असे व्हायला हवे. म्हणून तर संत जिवाला हितोपदेश करतात -

असा धरी छंद, जाइ तुटोनिया भवबंध!

आपल्या निवडीवरून जग आपली किंमत करते.

आत्मारामा, सद्गुरो, विवेक दे,वैराग्य दे.

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

प्रसाद पुष्पे - मन रिकामं ठेवू नका.

प्रसाद पुष्पे - मन रिकामं ठेवू नका.

मन गढूळ होणे यासारखे दुर्दैव नाही कोणते. का बरे असे व्हावे? आपण ते रिकामे ठेवले म्हणून.

जर आपण कुठले ना कुठले काम सतत करत आलो तर क्षुल्लक गोष्टी बोलायला, ऐकायला वेळच उरणार नाही.

मन जर नामस्मरणाने राममय झाले तर त्याला कौसल्या काय आणि कैकेयी काय दोघीही माताच.

सर्व भांडणांचे, द्वेषाचे मूळ 'मी, माझे' हेच आहे. अविश्वास बोलण्या, वागण्यात व्यक्त होतो. मनात भयगंड निर्माण झाला की आलेच रोग वस्ती करायला.

'मी रामाचा, राम माझा' असा दृढ निश्चय हवा. मनाची ही खंबीरता मनोबोध वाचून मिळते. कोणी कोणाचे भाग्य हिरावून घेऊ शकत नाही.

जो दुसऱ्या साठी खड्डा खणायला जातो तो स्वतः साठीच खड्डा खणतो.

स्वामी समर्थ भक्ताला काय सांगतात?
"भिऊ नकोस! मी तुझ्या पाठीशी आहे!"

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

प्रसाद पुष्पे - संत संग दे गा सदा.

प्रसाद पुष्पे - संत संग दे गा सदा.

संत साहित्य वाचावे! संत चरित्र ऐकावे! संतांच्या गावाला जावे.

"जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा" असा असतो संतांचा विश्वास.

संत देहावर असतात कधी?
त्यांचे मन आत्मरंगी रंगलेले असल्यानेच भवतरंग भंगले हे त्यांच्याबाबतीत अक्षरशः खरेच असते.

आपल्याला न दिसणारा देव संतांना मात्र दिसतो. संत त्या देवाशी बोलतात, खेळतात. लेकुरवाळा विठू संतसंगतीत अत्यंत रमून जातो. संत देवाजीची बाळे म्हणूनच जगाच्या अंगणात खेळतात, बागडतात.

भातुकली खेळावी, बाहुला बाहुलींचे लग्न लागावे, संसार करावा, आईचे बोलावणे आले की चट्टामट्टा करून चूल बोळकी आवरावी. पसारा भरून टाकावा टोपलीत.
संतांचे जगातले वावरणे, प्रपंच करणे तसे असते.

शिवथर घळीतील दासबोध लेखन, नेवासे येथील खांबाला टेकून गुरूच्या उपस्थितीत ज्ञानेश्वरांचे गीतार्थ कथन, भंडारा डोंगरावर तुकोबांना स्फुरलेले कवित्व - अभंगवाणी याच गोष्टी मनाला मोहवतात.
अशा देवदुर्लभ सुखलागि आरण्य सेवीत जावे.

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

प्रसाद पुष्पे - मनाचा मोगरा!

प्रसाद पुष्पे - मनाचा मोगरा!

पहाट होण्याची वाटच पहात असतो मी! अत्यंत शांत, शीतल, उत्साहवर्धक वातावरण! श्रीगोंदवलेकर महाराजांचे प्रवचन वाचताना वाटते महाराज सांगतात, तसेच वागू या ना आपण.

श्रीरामाचे नामस्मरण करण्याचा आनंद लुटू या - वाटू या!
पण फोटोमधले महाराज हसतात असे वाटते.

अरे मना, तू पुरता शरण नाही गेलास रामाला! वरचा विचार कितीही चांगला असला तरी त्यात 'मी' दडून राहिला आहे ना.?

श्रीरामच आतून नाम घेववतो, तिकडे अवधान जावे यासाठी डोळे मिटावे आसनावर स्वस्थ बसावे.

प्रभाते मनी राम चिंतीत जावा!

चालण्या, वागण्या, बोलण्यातही सुरेलपणा, मार्दव येईल का?

कुठेही, कुणाकडे बघतानाही दृष्टी निर्मळ होईल का?

पाटी स्वच्छ असू दे! म्हणजे तीवर काढलेली श्रीराम ही टपोरी अक्षरे देखणी वाटतील. नाम बिंबेल, रुजेल, मोगरा फुलून येईल.

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Saturday, September 2, 2017

प्रसाद पुष्पे - ॐ राम कृष्ण हरि!

प्रसाद पुष्पे -  ॐ राम कृष्ण हरि!

स्वामी स्वरूपानंदांचा समाधिकाळ जवळ आलेला. त्याच्या आधी थोडेच दिवस स्वामींनी अगदी निकटवर्तियांकडून हा जप आग्रहाने करवून घेतला. न थकता, न थांबता.

राम कृष्ण हरि या सहा अक्षरांच्या मागे ॐ शक्ती लावली. हा जप जितक्या सावकाश, हलक्या आवाजात उच्चारला जाईल तितक्या त्या नादलहरी आसमंत शुद्ध करतीलच पण जप करणाऱ्या साधकात अंतर्बाह्य सुधारणा घडवून आणतील.

राम! अवघी दोन अक्षरे. प्राणवायू आत भरून घेताना शीतलतेची जाणीव होते, अंगात चैतन्याचा संचार होतो. वाटते मन रमवणारी ही दोनच अक्षरे शिवाला इतकी आवडली की त्याने त्यांना हृदयी साठविले.

विषा औषध घेतले पार्वतीशे!

तो 'राम' हा नाद हळूहळू विराम पावतो तोच उच्चार केला गेला कृष्ण. हीदेखील दोनच अक्षरे.

कृष्ण! वासुदेव कृष्ण! देवकीनंदन कृष्ण! गोकुळचा राजा! रामापाठोपाठ हाही नकळत आत येऊन घुसला आणि त्या चित्तचोरट्याला आपला म्हणण्यावाचून गत्यंतरच नाही उरले.

जो राम आहे ना तोच कृष्ण बरं का! न फोडता येणारी अशी ही जोडी! या मनोहर जोडीने सगळ्या साधकांची विघ्ने हरली. मने जिंकून घेतली. मनाची बाहेर जाणारी धाव थांबवली. आणि मनाला अक्षरशः उलटले आणि नामाला लावले.

हरि! हरि!! हरि!

श्रीराम! श्रीकृष्ण! श्रीहरि! प्रत्येक नामातली श्री काढून घेऊन ॐ मागे लावला आणि जप झाला ॐ राम कृष्ण हरि!

सगुण निर्गुण असा भेदच नाही उरला. जसजशी वैखरीला या जपाची सवय लागली तसतशी आणखी एक गंमत सुरु झाली.

शिष्य आपोआप आसनस्थ होऊ लागला. ॐ राम कृष्ण हरि चाललाच होता. त्याचे डोळे आपोआप मिटले. श्वास संथ झाला. मानस गाभारी सोsहं घोष घुमू लागला. भूपाळी आठवली-

"प्रभात झाली स्वरूपनाथा या हो मम अंतरि! सोsहं घोषचि घुमत रहावा मानस गाभारी!"

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

Friday, September 1, 2017

प्रसाद पुष्पे - प्रसाद हवा हवासा.

प्रसाद पुष्पे - प्रसाद हवा हवासा.

'प्रसाद' देवाचे देणे. कृपाच ती. तो सेवन केल्यावर मनाला प्रसन्नता वाटलीच पाहिजे.

इतर वेळी खाण्यासाठी म्हणून केलेला शिरा आणि सत्यनारायणाच्या दिवशी प्रसादासाठी केलेला शिरा - चवीत केवढा फरक वाटतो पहा.

घरची भात आमटी आणि शिर्डी, गोंदवले, पावस अशा ठिकाणी पानावर आलेला प्रसाद - भोजन प्रसाद त्याची माधुरी अमृताला फिकी पाडणारी.

प्रसाद हा काव्यामध्ये ही गुण आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ प्रसाद आहे. मनाचे श्लोक हाही प्रसादच.

प्रासादिकता लेखनात हवी, भाषणात हवी. प्रसन्नता तनामनाला व्यापून उरली म्हणजे मग बाराही महिने आनंदी आनंदच.

भगवंतावर पूर्ण निष्ठा असली की चित्त सदैव प्रसन्न राहील.

भगवंता, मला तो प्रसाद दे! देशील ना?

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

Wednesday, August 30, 2017

प्रसाद पुष्पे - प्रार्थनेत आर्तता हवी.

प्रसाद पुष्पे - प्रार्थनेत आर्तता हवी.

त्वमेव माता च पिता त्वमेव -
सगळ्यांच्या नित्यपठणातला हा श्लोक! एकदा विचार करून पाहू या - कशा रीतीने म्हणतो आपण हा श्लोक.

या श्लोकातील उदात्त भावनेचा स्पर्श गाताना अंतःकरणाला झाला तरच काही ह्या म्हणण्याचा उपयोग!

भगवंताला हात जोडून, मनापासून नामस्मरण करून, त्याची सुंदर, रम्य, तेजोमय मूर्ती डोळ्यांपुढे आणून सावकाश हा श्लोक म्हणून पहावा म्हणजे आपल्या मनाला आयुष्यात कधीही निराशा स्पर्श करणार नाही.

देवाशी असलेल्या नात्याचे स्मरण राहील. आपल्या आत असलेला 'राम' इथे तिथे दिसायला लागेल.
आपण वैतागणार नाही.

ईश्वरानुरागी व्यक्तीच विरागी बनते आणि स्वानंद साम्राज्याचा अधिकारी होते. म्हणू या तर अर्थ जाणून -

त्वमेव माता च पिता त्वमेव। त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव। त्वमेव विद्या द्रविणम् त्वमेव। त्वमेव सर्वं मम देव देव।

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

Saturday, August 26, 2017

प्रसाद पुष्पे - गणपति बाप्पा मोरया!

प्रसाद पुष्पे - गणपति बाप्पा मोरया!

लहानांपासून थोरांपर्यंत, रंकापासून रावापर्यंत सर्वांना आवडणारा देव!

याचे जसे वर्णन करावे  तसे ते याला साजते आणि तरी तो तेवढ्याच स्तुतीत मावत नाही.

ज्ञानेश्वरीमधील गणेश वंदन पाहा, समर्थ रामदास कृत दासबोधातील गणेश वंदन पाहा, कवयित्री शांता शेळके यांचे 'गणराज रंगी नाचतो' ऐका.  गणपती अथर्वशीर्ष अर्थासह देहात मुरवा.
सारसबागेतील सिद्धिविनायक पहा! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशमूर्ती पाहा! सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती आर्ततेने म्हणा.  तुम्हाला गहिवर आलाच पाहिजे.

तुम्हा आम्हा सगळ्यांचा आवडता गणेश, तो गुणेश ही आहे.

नेता असावा तर असा! विद्या वितरक असावा असा! सूक्ष्मदृष्टीने कृपेचा वर्षाव करणारा गणपती.

गर्जू या तर सारे गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Friday, August 25, 2017

प्रसाद पुष्पे - गणरायांचे आगमन

प्रसाद पुष्पे -  गणरायांचे आगमन

आज गणेश चतुर्थी! आज घरोघरी मंगलमूर्ती येणार. श्रींची स्थापना होणार.

तसं पाहिलं तर ही शाडू मातीची मूर्ती.  परंतु भाविक लोक त्या मृण्मय मूर्तीत चैतन्य ओततात. प्राण फुंकताक्षणी ती मूर्ती साक्षात जिवंत होते.

मोठया प्रेमाने आरत्या म्हणायच्या, अथर्वशीर्षाची आवर्तने करायची. दूर्वा वाहायच्या, मोदकांचा नैवेद्य अर्पण करायचा.

गणेशाने केली सूर्याची उपासना! माणसाला माणूस जोडून देऊन त्याचा आत्मविश्वास जागवला. स्त्रियांना स्वसंरक्षण करण्यासाठी समर्थ बनविले.

श्री व्यासमुनी महाभारत सांगत होते, गणपतीने ते स्वतः लिहून काढले.

असुरांचा नाश केला. धर्मध्वज उभारला. मूषकरूपी काळाचे वाहन केले.

जितक्या आनंदाने मूर्ती आणायची तितक्याच आनंदाने गौरींबरोबर तिची पाठवणी करायची.  जलतत्वात पृथ्वीतत्व मिसळले. आकाश आणि तेज या तत्वांच्या साक्षीने. वायू तर आहेच तिथे.

पुन्हा तो अनंत आहेच ज्याच्या त्याच्या आत. जगात पाहुणा म्हणून आलो, पाहुणा म्हणून परतणार. न गुंतता..

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, August 20, 2017

प्रसाद पुष्पे - इथे तिथे पडलेली फुले वेचावीत!

प्रसाद पुष्पे - इथे तिथे पडलेली फुले वेचावीत!

आयुष्यातले कारणी लागणारे क्षण फारच थोडे! ते आठवावेत.

छंद जडू द्या नाम घेण्याचा, छंद जडू द्या देव मूर्तीमधून ओळखायचा, छंद जडू द्या वेदना हसत सोसण्याचा.

माऊलीच्या ओव्या पुन्हा पुन्हा वाचाव्या. छंद जडू द्या दुसऱ्याची दुःखे ऐकून घेण्याचा.

मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले
तयासारिखे भोगणे प्राप्त झाले

आपल्या वाट्यालाच दुःख का याचे उत्तर आहे या प्रश्नात.

आपण आलो एकटे, जाणारही एकटे, मग आता मधल्या काळातही वृत्ती 'उदासीन' असू द्यावी.

मनाने वरच्या पातळीवर वावरावे! नामाचा दोर घट्ट धरून ठेवला की कुठे दरीत कोसळणार नाही आपण.

जीवनाचा अवघड गड चढून जाऊ! मोकळी हवा घेऊ या!

नाम घेता घेता मन सु-मन करू या!

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Friday, August 18, 2017

प्रसाद पुष्पे - पूजेमध्ये मन का रमत नाही?

प्रसाद पुष्पे - पूजेमध्ये मन का रमत नाही?

पूजेमध्ये मन का रमत नाही?
त्याला नको तिथे रमायला आवडते म्हणून.

एक काळ असा होता, मंदिरात जायला मिळत नाही म्हणून लोक तळमळत असत.

पूजा करण्याची संधी मिळते तो माणूस भाग्यवान! आपली पूजा भगवंताला पोचावी यासाठी मन संवेदनशील हवे.

आपणा स्वतःला करून घ्यायला आवडतील असेच सगळे उपचार मूर्ती पूजेमध्ये आहेत.

मूर्तीला स्नान घालताना, मूर्तीचे अंग पुसताना तर देवच आपल्या हातात नाही का आला?

सुविचारांच्या जलधारांनी आपण सुस्नात व्हावे. चंदनाच्या खोडासारखा देह झिजवावा. देवमूर्तीला नवनवी वस्त्रे नेसवावी, गंध लावावे , फुले वहावीत आणि तटस्थ ते ध्यान निरखावे.

मनुष्याला कर्म ही कटकट वाटते. पूजा एक सक्तीचे कर्म म्हणून न करता  अंतर्मुख होण्याची संधी साधून घ्यावी.

कर्म हेच पूजन आहे.

तया सर्वात्मका ईश्वरा। स्वकर्मकुसुमांची वीरा। पूजा केली, होय अपारा। तोषालागी!

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, August 17, 2017

प्रसाद पुष्पे - प्रश्न चिंतेने सुटत नाहीत.

प्रसाद पुष्पे - प्रश्न चिंतेने सुटत नाहीत.

सारखी कसली ना कसली चिंता! काळजी! माणसाच्या मनाचा हा स्वभावच निरर्थक काळजी करत बसण्याचा!

आजारपण आले - चिंता! कर्ज फिटेना - चिंता! वरिष्ठ कोपतील - भीती आणि चिंता!

प्रश्न चिंतेने सुटत नाहीत तर चिंतनाने सुटतात. विचारांची देवाणघेवाण व्हावी लागते. आपली तळमळ जगाच्या ध्यानी आणून द्यावी, ज्ञानियाला वाट पुसावी.

प्रपंच आहे रामाचा। हे जाणे तो भाग्याचा!
अंतरि त्यांच्या रंगे राम, श्रीराम जय राम जयजयराम!

भय जावे, निर्भयता यावी, चंचलता जावी स्थिरता यावी, रडवेपणा जावा खिलाडू वृत्ती यावी.

रामनाम हे तनामनाचे रोग बरे करणारे औषध आहे.

समर्थाचिया सेवका वक्र पाहे।
असा सर्व भूमंडळी कोण आहे?

बलोपासना यासाठी, गुणोपासना यासाठी! साधना यासाठी सतत चालू ठेवायची.

गायत्री मंत्र जपायचा, अन्नदान करायचे, ज्ञानदान करायचे.

वेगळे रहायचे नाही समाजाशी समरसून जायचे.

मी तू पण जगन्नाथा होवो एकचि तत्त्वतः।

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Tuesday, August 15, 2017

असाही होतो कृष्णजन्म!

असाही होतो कृष्णजन्म

अंधाऱ्या रात्री विचार सुंदर सुचला
श्रीकृष्णजन्म तो मनामनातून झाला!ध्रु.

मज नाम अनावर कर्मे करता झाले
दिवसाच्या अंती मन आनंदे न्हाले
भगवंत लिहाया रात्री बसवी मजला!१

जे चुकले ते ते मुक्त मने मानावे
परि सावधपण ते नंतर अंगी यावे
प्रत्येक साधुही चुकता चुकता शिकला!२

जरि स्वजन जाहले चूक स्पष्ट सांगावी
मन शुद्ध आपले हरिकृपा उमजावी
आत्म्याचे बल दे संरक्षण धर्माला!३

हे माझे नाही सदा मना शिकवावे
ते श्रेय यशाचे ज्याचे त्याला द्यावे
सिंधूत बिंदु तो कैसा मिसळुन गेला!४

मी देह मर्त्य मी क्षुद्रताच ही कारा
गर्जून सांगतो आत्मा बंध झुगारा
पिंजरा सोडुनी पक्षी उडुनी गेला!५

हरि वाजवी मुरली अजून श्रीगीतेची
तो वाट पाहतो अजून त्या गोपींची
मन उत्सुक झाले हरिच्या उपदेशाला!६

घन निळा पाहता श्याम मनाला दिसतो
चल ऊठ जाग रे श्याम असा जागवतो
जागृति मनाची स्फुर्तिप्रद जगताला!७

त्या पडून जाव्या भेदाच्याही भिंती
मग मने मनाशी सत्वर समरस होती
एकत्र जेवणे हरिचा काला कळला!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

प्रसाद पुष्पे - काय होईल? कसे होईल?

प्रसाद पुष्पे - काय होईल? कसे होईल?

भीतियुक्त चिंता किंवा चिंतायुक्त भीती! का असे होते? माणसाचे मन त्याच्या देहाच्या सुख दुःखांशी अगदी जखडून बांधले गेले. 'मी देहच आहे' असा दृढ समज माणसाने करून घेतला आणि माणूस परतंत्रच झाला. वासनांचा गुलाम! समर्थांना अशा बिचाऱ्या माणसांची कीव येते. ते तर म्हणतात.

मनी मानव व्यर्थ चिंता वाहाते
अकस्मात होणार होऊनि जाते

मन खंबीर बनले पाहिजे. जे काही बरं वाईट घडेल ते रामाच्या इच्छेनेच घडणार. शाश्वताचा बरा निश्चय झाला की कोणी अशाश्वतासाठी रडणार नाही, झुरणार नाही.

मी देह नव्हे! मला जन्म नाही, मरण नाही. सुख नाही दुःख पण नाही.

चिदानंद रूप: शिवोsहम् शिवोs हम्

ही आद्य शंकराचार्यांची शिकवण ध्यानी घेऊ या, अंगी मुरवू या.

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Monday, August 14, 2017

प्रसाद पुष्पे - देव देहात दे हात.

प्रसाद पुष्पे - देव देहात दे हात.

देवाचिये द्वारी - एवढे उद्गार निघाले मात्र छोटा नातू बोलून गेला उभा क्षणभरी..

हरिपाठातला सर्वात पहिला अभंग. हरि मुखे म्हणा - हरि मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? ध्रुवपदच होऊन बसलं ते.

देवाचे द्वार कोणते? देवळाचा दरवाजा एवढाच मर्यादित अर्थ घ्यायचा का त्याचा? आणि मग क्षणभरच का उभे राहायचे तिथे? चिंतनाला चालना मिळत जाते.

चारी मुक्ती साधणारा तो चतुर हरिभक्त! हरि हरि! हा सोपा मंत्र जिभेच्या टोकावर बसलेला.

ज्ञानदेव महाराज  श्रीव्यासमुनींचा हवाला देत आहेत - द्वारकेचा राणा पांडवा घरी!

यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर:
तत्र श्रीविजयो भूतिध्रुवा नीतिर्मती मम।।

योगेश्वराला आपलासा करायचं तर आतला दरवाजा उघडायचा. ध्यानाला बसायचे. डोळे मिटून घ्यायचे आणि आतल्या घननीळाला त्याचे नाम घेत घेत पोटभर पाहून घ्यायचे. चंदनी पुरुष होऊन जायचे. आपल्या आतच तर आहे पंढरपूर-आळंदी-देहू सगळे काही.

लेखक - श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Saturday, August 12, 2017

प्रसाद पुष्पे - क्षमा! प्रार्थनेचा भाग!

प्रसाद पुष्पे - क्षमा! प्रार्थनेचा भाग!

क्षमा मागताना झाल्या चुकीबद्दल मनापासून वाईट वाटले पाहिजे. जिची क्षमा मागायची त्या व्यक्तीच्या मोठेपणाची जाणीव आपल्या शब्दशब्दातून प्रकट झाली पाहिजे.

क्षमा हा आपला अधिकार नाही तर क्षमा करणारी व्यक्ती आपल्यावर अनुग्रह करते अशी धारणा मनात बाळगावी.

क्षमायाचना करून लाभलेली क्षमा ही आपल्याला परिवर्तनाची लाभलेली संधी आहे.

बदल आतून घडलेला असला तरच तो स्थायी स्वरूपाचा, टिकाऊ असतो.

पृथ्वी - धरणीमाता खूप क्षमाशील असते, आपली आई देखील क्षमाशीलच असते. संत स्वभावतःच क्षमाशील असतात.

संत ज्ञानेश्वर म्हणजे तर मूर्तिमंत क्षमा! उगाच नाही त्यांना 'माउली' शब्दांनी हाका मारीत.

हा एकच सद्गुण अंगात बाणला तर माणसाचे आत्मिक बळ कितीतरी पटींनी वाढले असे जाणवेल.

शिवीला प्रतिशिवी हे उत्तर नव्हे. शिव्या ऐकताना मनोमन म्हणावे ज्याच्याजवळ जे असते तेच तर तो देत असतो. आपण त्या घेतल्याच नाहीत की कुठे जातील त्या?

उत्कटतेने मागितलेली क्षमा पुनर्जन्म घडविते.

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Friday, August 11, 2017

प्रसाद पुष्पे - समाज पुरुषा तुला प्रणाम.

प्रसाद पुष्पे - समाज पुरुषा तुला प्रणाम.

जर हेतु शुद्ध असेल तर कर्म शुद्ध! मनुष्य कर्मात "मी माझे" मिसळतो आणि आयुष्यच गढूळ होऊन जाते.

वय हे वाढतच असते. कर्मे तर करावीच लागतात. मग ती सेवाभावाने, आनंदाने का करू नयेत? लोकांच्या सहकार्याविना आपले पावलोपावली अडत असते. ही जाण जर आपण मनात बाळगली तर आपण समाजाचे कृतज्ञ राहून आपल्या जीवनात अर्थ भरू शकू.

समाजाने जगात आणले, लहानाचा मोठा केले, संसार थाटून दिला, आजारात शुश्रूषा केली, समाजच शेवटी मूळ ठिकाणी पोचविणार.  जनी जनार्दन पहायला शिकू या.

ज्या प्रमाणे जन्मदात्रीचे ऋण कधीच फिटत नसते त्याप्रमाणे व्यक्ती समाजाची सेवा करील तेवढी थोडीच आहे.

व्यक्तीपेक्षा संस्थेचा आयुष्यकाल दीर्घ असतो. जे राव नाही करू शकत ते गाव करून दाखवतो.

एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ!

सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे!

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, August 10, 2017

प्रसाद पुष्पे - आजोबाला सद्गुरु नातू!

प्रसाद पुष्पे - आजोबाला सद्गुरु नातू!

अनेकदा वाटते जर काही लिहावयाला नाही तर मग का बळेबळे लिहायला बसावे.  पण लगेच आतून आवाज येतो - लेखन एक साधनाच आहे असे समज.

काल दुपारचीच गोष्ट. अंगणात नातवाबरोबर खेळून त्याच्या इच्छेविरुद्ध वर फ्लॅटमधे आलो. नातू आत घेईना - दार लावू लागला. मी जरा रागाने दार जोरात ओढले, त्याची बोटे दारात सापडली. कळवळून ओरडला तो बालजीव.

वातावरणातला तणाव वाढला. काही काळाने नातू प्रसंग विसरूनही गेला. दुपारी आजोबाबरोबरच झोपला. पुन्हा त्यांच्याशी खेळायला तयार.

मग आपणही काही गोष्टी जीवनात प्रतिकूल घडल्या तर देवावर इतके रागवायचे का? रुसायचे का? त्याच्या अस्तित्वाबद्दलच शंका घ्यायची? पूजा सुद्धा करायचा कंटाळा करायचा?

आपण शुद्ध बुद्धिवादीही नाही आणि भाविक भक्तही नाही. त्रिशंकूसारखी मधलीच स्थिती आपली.

देवा, वय वाढले त्याला इलाज नाही. पण लहान मुलाची निरागसता दे.  त्याच्यासारखे लवकर विसरायला, रडत रडत हसायला शिकव.

ते मूल जसे आजी आजोबांना बिलगते, तसं मला गोड स्वरात तुला आळवायला जमू दे.

नातवालाच गुरु करायला हवं नाही!

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले.
( हे १९९३ सालचे लेखन आहे)

Wednesday, August 9, 2017

प्रसाद पुष्पे - वाटाड्या हवा आहे.

प्रसाद पुष्पे - वाटाड्या हवा आहे.

खरंच देव आहे का? असला तर तो मला दिसेल का? तो माझ्या इच्छा पुरवील का? का रे? हसलास का असा?

हसू नको तर काय करू? अडाण्यातला अडाणी तू. देव आहेच आहे. यात कसलीही शंका नाही. पण आधी तू स्वतः मी कोण? याचा विचार कर. तू विचारत असलेले प्रश्न सुचवले कुणी?

सद्गुण, सौन्दर्य, त्याग, विशालता, औदार्य जाणवताच तू नतमस्तक होतोस ना? तिथेच देवपण आहे.

देव केवळ पहायचा नाही - अनुभवायचा आहे - नव्हे नव्हे  आपणच संस्कारांनी, उपासनेने तसं व्हायचे आहे.

तुकाराम पांडुरंग पहायला गेले - त्यांच्या हातून नामसंकीर्तन घडले, ध्यान चिंतन झाले - ते देहातच विदेही बनले आणि त्या सावळ्या विठ्ठलाहून कुणी वेगळे असे राहिलेच नाहीत. स्वतः पांडुरंग होऊन गेले ते.

तू भल्या पहाटे उठावेस, आन्हिके उरकून देवघरातल्या देवाला नमस्कार करून आसनावर बसावेस, मुखात नाम असावे, हळू हळू मनाला याची गोडी लागेल, मग काय देवाची आणि तुझी भेट नित्याचीच होत राहील.

हे बघ तू असे विचारण्यावरून तरी वाटते आहे देव तुला हवा आहे तुझ्या इच्छा पुरविण्यासाठी. चुकलास गड्या तू!

आपली अशी इच्छा - वासना ठेवूच नये कधी. इच्छा देवाची! तोच वाहतो अखंड चिंता अनंत या विश्वाची!

तू सश्रद्धच राहा. अश्रद्ध होऊ नकोस. देव होता नाही आले तरी चालेल. धडपडणारा माणूस हो. प्रेम करीत जा. आनंद वाटत जा. तुला इथे तिथे, आत बाहेर भगवंत जाणवल्याशिवाय राहणार नाही.

लेखक - श्रीराम बाळकृष्ण आठवले

प्रसाद पुष्पे - काय निवडून घेणार?

प्रसाद पुष्पे - काय निवडून घेणार?

या उपाधिमाजी गुप्त। चैतन्य असे सर्वगत। ते तत्वज्ञ संत। स्वीकारीती।।

संत सार तेवढे नेमके घेतात.  असार सहजपणे बाजूला सारतात. तिकडे बघतही नाहीत ते. कसे जमते त्यांना हे?

विवेकाने जमते. सद्गुरु हृदयात वास करतात आणि पावलोपावली जपतात, सन्मार्गावरच ठेवतात.

मी कोण? हे कळण्यासाठी मी कोण नाही हे सविस्तर कळले की काम भागले.

मी देह नव्हे, मी मन नव्हे, मी बुद्धी नव्हे. एकेक गोष्ट अंतरात चिंतनाने ठसत जायला हवी.

नामस्मरण चिंतनाला चालना देते.
प्रभाते मनी राम चिंतीत जावा. दिवसाच्या पहिल्या प्रहरात राम चिंतावा. आयुष्याच्या आरंभी, शैशवातच भक्त होता यावे.

लहानपणापासून हे संस्कार कथाकथन, भक्तिगीत गायन, स्तोत्र पठण, सूर्यनमस्कार, बलोपासना इत्यादी उपक्रमातून ठसविता येतील.

काय वाचायचे ते कळावे, काय पहायचे ते कळावे. जनी निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे.  सुपासारखे व्हावे. जनी वंद्य ते सर्व भावे करावे.

सार सार को गहि रहै। थोथा देइ उडाय।

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Monday, August 7, 2017

प्रसाद पुष्पे - तू वाटचाल चालू ठेव.

प्रसाद पुष्पे - तू वाटचाल चालू ठेव.

कुठेतरी, कधीतरी थांबायला लागणार आहे. अगदी खरे आहे. पण चालत असताना हा विचार कशाला चालू ठेवायचा?

आपण आपले चालत राहावे. भक्तिपंथेची जावे. तो भक्तीचा मार्ग आद्य रामदास मारुतिराय चालून गेले. आदिनाथ, आदिसिद्ध, आदिगुरु शंकर याच मार्गावरचे प्रवासी.

तेव्हा ओघाने आलेले काम मनामधले प्रेम ओतून कौशल्य पणाला लावून करायचे. नाम घेत राहायचे. एकदा का हे मन रामरंगी रंगले की देहाची अवस्था कोणतीही असो!

'अनुसंधाना कधी न चुकवावे'.

यासाठी करायचे काय? श्रवण चुकवायचे नाही. सत्संगाची संधी साधायची. सुमधुर आणि सत्य वचन बोलायचे. हा आपला, हा परका हा भेद मनातून निघून जावा यासाठी इथे तिथे त्या भगवंतालाच पहायला शिकायचे.

म्हणून तर प्रपंचात राहून परमार्थ करायचा. साधना करीत राहिले की अंतरंग, बहिरंग दोन्ही शुद्ध होतील.

समर्थांचे दोन श्लोक सर्व भाव ओतून म्हणू या.

सदासर्वदा योग तूझा घडावा। तुझे कारणी देह माझा पडावा।उपेक्षू नको गूणवंता अनंता। रघूनायका मागणे हेचि आता।।

उपासनेला दृढ चालवावे। भूदेव संतांसि सदा लवावे। सत्कर्मयोगे वय घालवावे। सर्वामुखी मंगल बोलवावे।।

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Sunday, August 6, 2017

प्रसाद पुष्पे - शिशुपण बरवे हृदया वाटे.

प्रसाद पुष्पे - शिशुपण बरवे हृदया वाटे.

ज्या रंगांच्या काचांचा चष्मा आपण घालू त्या रंगाचे जग आपल्याला दिसणार. म्हणजे जग असायचे तसेच असते पण आपल्या मनातल्यासारखे ते आपल्याला भासते.

कोणाविषयी आपल्या मनात अढी असली, मन कलुषित असले की त्या व्यक्तीचे सत्कृत्य आपल्याला कौतुकास्पद नाही वाटत.

सगळे जग आपल्याला हसरे, नाचरे, विविध रंगी असे वाटायला हवे.  वृक्षवल्लरी, वनचरे आपली सोयरी धायरी व्हायला पाहिजेत. तर मग सृष्टीशी जवळीक साधू या.  माती पाणी, उजेड, वारा, आकाश यांचे हे जग. आपल्या देहाचे ही घटक नेमके तेच.

खेळावे जरा मातीत, करावे बागकाम शेती, प्यावे झऱ्याचे थंड मधुर पाणी, घ्यावे जरा ऊन अंगावर, सोसावा थोडा झोंबरा वारा. जगायला मनाचे का होईना बालपण चांगले. किती उशिरा कळते पण हे!

संतसाहित्य मनाच्या मशागतीला फार चांगले, बालकवींच्या कविता गाव्यात, उत्तमोत्तम ठिकाणे पहावीत, रात्री अभाळातलं चांदणं पहावे, देवाला स्मरावे आणि त्याला म्हणावे, तू जे दिलेस ते घेण्याला हे हात दुबळे ठरतात, तरी तुला माझा नमस्कार.

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Saturday, August 5, 2017

प्रसाद पुष्पे - कधी होशील माणूस?

प्रसाद पुष्पे - कधी होशील माणूस?

मनुष्याचे मनुष्यपण कशात आहे? ते केवळ देहात नाही हे उघडच आहे.

आहारनिद्राभयमैथुनं च  सामान्ययेतत् पशुभि: नराणाम्

माणसाला मन दिलं आहे, त्याला बुद्धीचीही देणगी लाभली आहे देवाकडून.

माणसाने माणसाशी माणुसकीने वागणे हाच खरा धर्म.  जशा आपल्याला भावभावना आहेत तशाच त्या दुसऱ्यालाही आहेत.
'मन कोणाचे कधी न दुखवावे'
जर केवळ विकाराधीन झाला तर मनुष्य पशुत्वाकडे झुकला. त्याने नाशच ओढवून घेतला आणि मनुष्याने विवेकाने आपली क्रिया पालटली, तो संयम शिकला, सदाचारी बनला तर त्याचा प्रवास देवत्वाच्या दिशेने सुरु झाला असे समजावे.

मर्यादित अर्थाने का होईना आपण असे म्हणू शकतो की माणसाला कर्मस्वातंत्र्य आहे.  त्याने अटळ असलेले कर्मच अशा कौशल्याने करावे की ते करताना त्याच्या मनात फलाची अभिलाषा नसावी. कर्तृत्वाचा अभिमान नसावा. समर्पणाची भावना असावी.

सावता माळींनी आपला व्यवसाय कसा केला? जनीने सेवा चाकरी करता करता विठ्ठल कसा आपलासा केला?

जन्माला आल्याचे सार्थक त्यात आहे.

आपल्याकडे आचारभेद असलेले अनेक पंथ आहेत. पण सगळ्यांचा गाभा माणुसकी आहे, प्रेम आहे. वरवर पाहू नये. मनाने आत आत जावे.

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Friday, August 4, 2017

प्रसाद पुष्पे - कृपा आहेच, दृष्टी हवी!

प्रसाद पुष्पे - कृपा आहेच, दृष्टी हवी!

संत छातीवर हात ठेवून सांगतात "तुम्ही फक्त भगवंताचे नाव घ्यायला लागा, त्याची तुमच्यावर कृपा आहेच. फक्त ती कृपा ओळखण्याची दृष्टी हवी."

मनुष्य स्वभाव मात्र असा की जर काही चांगले घडले तर सगळे श्रेय आपल्याकडे घ्यायचे आणि काही वाईट घडले की मात्र त्याचे खापर देवाच्या माथी फोडायचे. म्हणजे माणसाला देव हवाय पण कशासाठी? त्याच्या बऱ्यावाईट इच्छा त्याने तातडीने पुरवाव्यात म्हणून आणि कारण असो नसो अनेकदा शिव्याच घ्याव्यात त्या देवाने.

अधःपाताचे कारण विवेक सुटणे.
'बरा निश्चयो शाश्वताचा करावा.'
आपण नेमके त्याच्या उलट वागतो.
देव स्वप्नात देखील कधी कोणाचे वाईट करणार नाही. तो तुमचे कशाला काय वाईट करील?
प्रपंचातील सुखदुःखे तुमच्या पूर्वसंचिताचे खेळ आहेत.
आता देवाला शिव्या घालून आणखी पापाचे धनी नका होऊ.

मूर्तीला देवपण आले टाकीचे घाव निमूटपणे सोसल्याने. तसेच आपल्यावर जर कौटुंबिक आपत्ती एकामागून एक येत असल्या तर धैर्य एकवटावे, निजनिष्ठेने नाम घ्यावे, प्रल्हाद बनावे.

भगवंताची कृपा चिंतनाने जाणवल्याखेरीज राहणार नाही.
कवि प्रदीप म्हणतात -
"दुनियाके पालनहार, तेरे फुलोंसेभी प्यार, तेरे काटोंसेभी
जो भी देना चाहे दे दे करतार, दुनियाके तारनहार."

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Thursday, August 3, 2017

प्रसाद पुष्पे - आस मुक्त श्वासाची..

प्रसाद पुष्पे - आस मुक्त श्वासाची.

जग काय म्हणेल? या भययुक्त भावनेने वागणे हा झाला व्यवहार.   अर्थात् जगाने आपल्याला चांगलेच म्हणावे असे वाटते तर मग जगाला आपली भक्ती दिसावी, औदार्य दिसावे, विद्वत्ता दिसावी, श्रीमंती दिसावी या भावनेतून गोष्टी घडत जातात. वेगवेगळे समारंभ पहा, माणूस कसा वागत असतो? झालंच तर जयंती, पुण्यतिथी यांचे कार्यक्रम पहा.

एकंदरीत सगळं वातावरण असं असतं की गोंधळायला, गुदमरायला होतं, मोकळेपणा वाटत नाही.

मुखवट्यांचे जग! आनंदप्रदर्शन नकली तसंच दुखवटा - तो सुद्धा नकली.

जो तो योजनापूर्वक अभिनय करतो. जगाला बेमालूमपणे फसवता फसवता आपणही फसतो.

यातून बाहेर नाही का पडता येणार? मोकळी हवा नाही का कुठेच मिळणार?

आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे. मनातल्या मनात नाम घ्यावे. तो आतून साह्याला धावतो. विवेक सुचवतो. मात्र मग आता जनाचे न ऐकत बसता केवळ त्याचेच ऐकावे.

भगवंत काय म्हणेल? तो आपल्याकडे नेहमीच पहात असतो हे जाणून कुणाचेही मन न दुखवणे, स्वकर्तव्याला न विसरणे, कुणाविषयी अढी न ठेवणे हाच तो परमार्थ.

'तो दंभ नको, अभिमान नको, मज भक्ति हवी ती दे देवा!'

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Wednesday, August 2, 2017

प्रसाद पुष्पे - वज्र व्हावे या मनाचे.

प्रसाद पुष्पे - वज्र व्हावे या मनाचे.

लेचेपेचे मन काय कामाचे?
चंचल मन माणसाला नाचवते. त्याची धिंड काढते. गोविंदाचे पायी स्थिरावलेले मन त्याला आनंद देते.
मन हे व्रतांनी, नियमांनी बांधून घ्यावे.
स्वातंत्र्यवीरांचे मनच पाहा ना!
स्वातंत्र्यप्राप्ती हेच ध्येय असणारे ते म्हणतात.
"की घेतले व्रत न हे अम्हि अंधतेने,
लब्धप्रकाशइतिहास निसर्गमाने -
जे दिव्यदाहक म्हणोनि असावयाचे
बुद्ध्याची वाण धरिले करि हे सतीचे!"

कणखर मनापुढे काळाचेही काही चालत नाही.
"बचेंगे तो और भी लडेंगे!" दत्ताजी शिंदेंची वाणी.
बलाढ्य रावणावर वनवासात असलेल्या राम लक्ष्मणाना विजय मिळवता आला. मनाची साथ लाभली.

या मनाला ज्याची गोडी लावावी त्याला ते चिकटते. गुळाच्या ढेपेला मुंगळा चिकटावा तसे!

समर्थांनी सज्जन मनाला भक्ति पंथानेच जाण्याचा उपदेश केला आणि त्याला विषयापासून विरक्त आणि रघुनाथाच्या ठिकाणी अनुरक्त करून दिले.

मनाला श्वासोच्छ्वासाच्या गतीशी जोडले आणि धरिता सो सोडता हम् शिकवले की आत चाललेला अजपाजप जाणवतो. हाच परमानंद.

भगवंताच्या ऐश्वर्याचा अनुभव येण्याला गीतेतील ११ वा अध्याय विश्वरूपदर्शन योग वारंवार वाचावा आणि लगेच १२ वा भक्ति योगाचा अध्याय म्हणावा.

संतांचे मेणाहून मऊ असे अंतःकरण प्रसंगी वज्राहून कणखर होते ते केवळ अंतरंग साधनेमुळेच.

उपासनेला दृढ चालवावे! ते यासाठीच.

निश्चयाचे बळ। तुका म्हणे तेचि फळ।

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, August 1, 2017

प्रसाद पुष्पे - उद्योगी तो सदा सुखी.

प्रसाद पुष्पे - उद्योगी तो सदा सुखी.

कंटाळा!
जगण्याचा कंटाळा आला म्हणणारा ही जगत असतोच. अंगात वर्षानुवर्षे जो आळस साठून राहिला ना तोच कंटाळा शब्दाने प्रकट होतो.
कशाचा कंटाळा येतो आपल्याला? पहाटे उठावेसेच वाटत नाही, देवाची पूजा करावीशी वाटत नाही, डॉक्टरांनी सांगितलेले पथ्य अप्रिय वाटते. हा कंटाळा आपला चेहरा त्रासिक बनवतो.

आळोखे पिळोखे देणे, जांभया देत सुटणे, काहीतरी चाळा म्हणून मग विविध व्यसनं.  म्हणून म्हणतो 'कंटाळा' हा शब्द टाळा.

ज्याचा आपल्याला कंटाळा तेच काम प्रेमाने उत्साहाने, श्रद्धेने करू लागायचे. परिश्रम करायचे, घाम गाळायचा. भुकेहून दोन घास कमीच खायचे. नाम घ्यायचे, संत साहित्य थोडे तरी वाचायचे आणि संधी मिळेल तेव्हा सत्संग साधायचा. मनाचे दास नाही व्हायचे आपण. लहान मोठे मोह जिंकायला लागायचे.

'उद्योग' शब्द केवढा अर्थपूर्ण!

समर्थ रामदास भारतभर पायी हिंडले. देश पाहिला, स्थिती जाणली. मारुती स्थापून बलोपासना दिली, जीवनात 'राम' आणला.

संत तुकाराम! भंडारा डोंगरावर गेले. ध्यान साधना घडली. अभंगवाणी स्फुरली.

विविध ग्रंथ अभ्यासुया, पचवू या, जमेल तितके आचरणात आणू या.
नियमित व्यायाम करू या! चांगल्या उपक्रमांमधे व्यस्त राहुया!

कंटाळा शब्द हा टाळा, उद्योगी तो सदा सुखी
प्रयत्ने घडला राम, अर्धांगी जानकी सखी

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Monday, July 31, 2017

प्रसाद पुष्पे - श्रद्धा!

प्रसाद पुष्पे - श्रद्धा!

मानला तर 'देव' नाही तर...... कशाला तो शब्द उच्चारा?
आपण कोणाला आणि काय मानतो ते महत्त्वाचे. मातृदेवो भव। पितृदेवो भव। आचार्य देवो भव।

केवढा सुंदर आणि महत्त्वाचा उपदेश आहे या वचनात. समर्थांचे वचनच पहा ना "यत्न तो देव मानावा".

श्रद्धेशिवाय माणूस मनुष्य असूच शकत नाही. दोन जन्मठेपांची शिक्षा ऐकूनही वीर सावरकर डळमळले नाहीत,  अंदमानच्या कारावासात लिहून गेले -
अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला
मारिल मज जगति असा कवण जन्मला?

"न योत्स्ये" असा एकतर्फी निर्णय घेतलेला अर्जुन श्रीकृष्णाला सद्गुरु मानता क्षणी मोह निरसन झाल्यावर म्हणाला - 'करिष्ये वचनं तव।'

पण कोणाचे ऐकायचे? कोणाचे नाही ऐकायचे?
भले बुरे ते आतुनि कळते!

विवेक आत आहे त्या सद्गुरुचेच ऐकावे. द्वाड इंद्रियांचे कधीही ऐकू नये.
श्रद्धा  माणसाचे जीवन घडविते. निरार्थकात अर्थ भरून जाते.

कोणी बुद्धिभेद केला नि डळमळली तर ती श्रद्धा कसली?
श्रद्धा हवी प्रल्हादाची! निष्ठा हवी एकलव्याची! मनाची एकाग्रता श्रद्धेमुळे त्वरित होते.

साधना श्रद्धेचे बळ वाढवीत जाते. जशी श्रद्धा तसे आपण! जसे यत्न तसे आपण!

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, July 30, 2017

प्रसाद पुष्पे - स्वच्छता मोहीम!

प्रसाद पुष्पे - स्वच्छता मोहीम!

आपण केर काढतो का? रोजच्या रोज? अगदी प्रत्येक खोलीचा? कोपऱ्यात साठून नाही ना राहात कधी?

तुमची स्वच्छते बाबतची जागरुकता अगदी कौतुकास्पद आहे. बरे पण आता विचार करु या आपल्याच मनाचा! तिथे कसला केर नाही ना साठला? पूर्वग्रहांचा - कामक्रोधाचा, संशयाचा, द्वेष मत्सराचा? नकळतच आपला हात गेला आपल्या नाकाकडे!

मनातली घाण पोटातल्या घाणीपेक्षाही वाईट! आरोग्य बिघडते ते त्यामुळे.  पोट साफ करायला एरंडेल नाहीतर त्रिफळा चूर्ण! मन साफ रहायला - नामजप, ध्यान, सद्ग्रंथांचे श्रवण!

अहो मनाला जी गोडी लावावी, ती लागते. कालचा दिवस गेला निघून.  मनाचे प्रदूषण थांबवायला दर दिवशी नव्याने वागायला सुरुवात करायची.  चुका दक्षतेने टाळायच्या. बोलणे कमी करायचे, त्यात गोडवा आणायचा, वेगवेगळी टीव्ही चॅनेल्स, त्यावरच्या मालिका, चित्रपट (काही सन्माननीय अपवाद वगळता) म्हणजे पचनाला जड असे भेळीसारखे, पदार्थच, नकोतच ते.

चला जळमटे काढू या. भगवंताचे नाव घेऊ या.  तुटायला आलेले भावबंध गोड बोलून, विधायक कृती करून, भगवंताची प्रार्थना करून दृढ करुया! आणि शेवटच्या श्वासापर्यंत विश्वास बाळगू या - भंगवंत दयाळू आहे! तो जे करील ते आपल्या हिताचेच करील! श्रीराम!

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

Saturday, July 29, 2017

प्रसाद पुष्पे - संतांचा विश्वास

प्रसाद पुष्पे - संतांचा विश्वास

उपासना करण्यापेक्षा ती हातून घडावी यासाठी देवापुढे हात जोडून एवढे म्हणू या, 'प्रभो तुझी उपासना घडो सदा तनामना!

भगवंताच्या जवळ नित्य असायचे, त्याच्याशेजारी बसायचे, स्वस्थ व्हायचे. त्याचा आदेश ऐकायचा आणि त्याप्रमाणे तंतोतंत वागायचे.

घरादाराची, देहाची स्वच्छता ही पहिली पायरी, धूत वस्त्रे परिधान करणे, रांगोळी काढणे, निरांजन लावणे , उदबत्ती लावून मूर्तीपुढे आसनावर बसणे ही झाली वातावरण निर्मिती.

देवाने निर्माण केलेल्या सुंदर जगात आपण आलो. ते जग आपल्या जगण्याने अधिक सुंदर व्हावे ही जगन्माउलीची साधी अपेक्षा.

'मी देह', 'माझे, माझे' असे वाटणे ही देहबुद्धी. तिथून पुढे प्रवास करत करत 'तोच मी' ही धारणा दृढ होईपर्यंत वाटचाल घडली पाहिजे.

सद्ग्रंथांचे वाचन यासाठीच. भगवंताच्या नामाचा जप तो यासाठीच. देहू, आळंदी, पंढरी इथे वारंवार जायचे यासाठीच. भगवंताच्या मूर्तीचे दर्शन घ्यायचे यासाठीच.

प्रत्येकाच्या आतला देव जागला की दुरितांचे तिमिर आपोआपच जाईल. विश्वस्वधर्मसूर्यामुळे प्रकाशित होईल. परस्परांशी मैत्री वाढल्यावर संतमंडळी सुखी होणारच.

असे रामराज्य भूवर कलियुगात देखील येते हाच संतांचा विश्वास.

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Friday, July 28, 2017

प्रसाद पुष्पे - दृष्टी बदला, सृष्टी बदलेल!

प्रसाद पुष्पे - दृष्टी बदला, सृष्टी बदलेल!

आपण जे काम करतो ते कोणत्या दृष्टीकोनातून? ते करत असताना आपण जळफळतो का? कसेबसे उरकून टाकतो का? तसे असेल तर त्यापासून आपल्यालाही सुख नाही, दुसऱ्यालाही समाधान नाही.

"मी हे कर्म करतो" हा कर्तेपणा उपद्रवकारक आहे.  नदी वाहत असते पण वाहण्याचे तिला भान नाही. सूर्य उगवतो प्रकाश देतो पण त्याला त्याची जाणीव नाही. हातून घडत असलेल्या कर्माकडे बघण्याची दृष्टी बदलली की ते कर्म अधिक चांगले करण्याचा हुरूप वाढेल.  हात काम करीत असावेत, मुख नाम उच्चारीत असावे. नकळत मन रामरंगी रंगेल, शांत होईल.

जे आवडत नाही - अवघड वाटते तेही काम भगवंताचेच असे समजावे, शिकून घ्यावे.

तो क्षणोक्षणी शिकवत असतो आपण शिकत नाही.  तो भरभरून आनंद देत असतो, आपण आनंद घेत नाही. "नारायण" हा मुक्तीचा मंत्र आहे तो जपत राहावा.

कर्मे कोरडी, भावशून्य न व्हावीत.     त्यात ओलावा असावा. तो नामस्मरणाने निर्माण होतो.

तक्रार करत राहणारा कोणालाच आवडत नाही. आपण ज्या परिस्थितीत असू ती नीट समजून घ्यावी, आपल्या सोयीची भूमिका ठरवून घेऊन तसे वागावे.

संयम, विवेक, सहनशीलता, आत्मीयता,  प्रेमभाव हे गुण ज्याने अंगी बाणवून घेतले त्याला सगळे विश्वच आपले घर वाटते.

तो सगळ्यांचा, सगळेच त्याचे!
पूजा हे कर्म न बनता प्रत्येक कर्म  भगवंताची पूजा म्हणण्याच्या योग्यतेचे व्हावे.

जीवन ही जटिल समस्या आपल्या वागण्याने, वृत्तीने वाटते.  जीवन हा गमतीचा खेळ आपणच बनवू शकतो. होय ना?

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, July 27, 2017

प्रसाद पुष्पे - क्षण साधा, झडझडून निघा..

प्रसाद पुष्पे - क्षण साधा, झडझडून निघा..

मी हे बोलत आहे ते बरोबर आहे ना?
मी हे करत आहे ते योग्य आहे ना?
असा आपला आपल्याशीच विचार करावा आणि पुढचे पाऊल उचलावे ते माघार न घेण्यासाठीच.
सद्गुरू म्हणजे विवेक! सारासार विचार! सद्गुरु म्हणजेच आत्माराम! सत्कार्याचा प्रेरक!
आपण यासाठीच वारंवार एकांतात बसण्याची, साधना करण्याची नितांत आवश्यकता आहे.
संशय, मत्सर, कुत्सित वृत्ती, हीन अभिरुची, विलासी वृत्ती, विघ्नसंतोषीपणा किती म्हणून गोष्टी सांगाव्यात.
मनात नरक साचलेला असतो आपल्या, छे, छे आपण नरकातच  मुक्काम ठोकून असतो.
पण याची जर आपल्याला जाणीव झाली असेल तर तोच क्षण साधायचा झडझडून निघायचा.
वाल्याचा वाल्मीकी झाला!
अक्षरशत्रू असलेला माणूस कालीमातेच्या उपासनेने महाकवी कालिदास बनला!
अरे मग काय अशक्य आहे आपल्याला?
पश्चाताप होऊन वर्तन सुधारणे चांगलेच. पण पश्चाताप वाटेल असे काही मुळात हातून न घडणे हे अधिकच चांगले नव्हे का?
म्हणून तर श्रीतेमुखी रामायणात कवीने असे म्हटले आहे -
कसे बोलतो, कसे वागतो गोष्ट जरी ही साधी "श्रीरामाला रुचते का हे?" विचार करु या आधी.
शुभस्य शीघ्रम्!
चांगल्या गोष्टीला विलंब कशाला?
उद्या करायचे ते आज! आज करायचे ते आत्ताच!

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Wednesday, July 26, 2017

प्रसाद पुष्पे - जीवाचा सखा..

प्रसाद पुष्पे - जीवाचा सखा!

तुम्ही या जगात आल्यापासून जगाचा निरोप घेईपर्यंत तुमची अखंड साथ देणारा मित्र कोणता? श्वास घेता, निःश्वास टाकता! पुन्हा श्वास घेता! ही प्रक्रिया अखंड चाललेलीच आहे. आपल्याला भानही नाही त्याचे!

श्वास! तो योग्य लयीत चालू आहे हा विश्वास धरूनच तुमची कामे चालू असतात, होय ना?

मनाने त्या श्वासावर लक्ष ठेवून असायचे. तुमचा तुम्हाला श्वास घेण्याचा सोडण्याचा अति सूक्ष्म ध्वनी ऐकू येईल. एक सुंदर लय सापडेल.

भगवंताच्या या लीलेकडे लक्ष जाताच थक्क व्हायला होते. मग त्याच्या विषयी वाटणारी कृतज्ञताच त्याच्या नामाच्या उच्चारातून आपल्या मुखावाटे व्यक्त होते. संत सांगतात की वैखरीने उच्चारता ते नामच जोडून द्या ना श्वासाशी!

धरिता सो, सोडिता हं (अहम्)
अखंड चाले सोsहम्  सोsहम् ।।

भगवंताशी अशी जवळीक प्रभातकाली फारच चांगली साधते. भक्ताचे भगवंताशी लग्नच लागले म्हणायचे!

नाम घेत घेत जर कीर्तन, प्रवचन, निरूपण यांचे श्रवण घडले तर त्या सुखाला ना अंत ना पार!

तुकाराम महाराजांचा हा अनुभव पाहा ना

आणिक दुसरे मज नाही आता।
नेमिले या चित्ता पासोनीया -
पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी!

अनाम आणि अरूप असा भगवंत संतांनी आपल्या भावभक्तीने अधिक देखणा, गुणवान केला.

"प्रभाते मनी राम चिंतीत जावा
पुढे वैखरी राम आधी वदावा",  ते यासाठीच.

© लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, July 16, 2017

गीतारहस्य नित्यपाठ




गीतारहस्य नित्यपाठ

कृष्ण कृष्ण म्हणत मला कृष्ण व्हायचे
त्यज विकार कर विचार हे म्हणायचे ! १

कृष्ण जन्म बंदिगृही मुक्त तो सदा
गीता ही कथित सार चिंतका तदा ! २

मन अपुले अलग करुनि शांत व्हायचे
नयन मिटुन मार्ग सुचुन मुक्त व्हायचे ! ३

मीच मला सावरता विजय लाभला
मन ओतुनि सजवी कर्म भक्त तो भला ! ४

यश येवो अपयशही फरक कोणता?
आस फली नसत तिथे खेद कोणता? ५

दु:खमूळ वखवख ती फेकता दुरी
संयमात सौख्य सहज समजवी हरी ! ६

कृष्ण कसा जगला गीतेत हे कळे
लोकमान्य चरित गूढ चिंतने कळेे ! ७

समजे जे थोडेही वाचणे पुन्हा
आचरणी आणुनि ते सांगणे जना ! ८

सोसुनि आघात सहज दडव वेदना
सोने निकषा उतरत सरत मीपणा ! ९

यत्ना ना जमत असे या जगी नसे
वैराग्ये मनुजाची कांति खुलतसे ! १०

मन प्रसन्न जग प्रसन्न मर्म जाणणे
हसऱ्याचे वावरणे दिसत देखणे ! ११

दु:खाला विसरताच दु:ख संपते
आठवता भूत बनुनि छळत सतत ते ! १२

जगलो वा मेलो वा सृष्टि चालते
सुजन कधि न मीपणास माथि मिरवते ! १३

सृष्टीशी समरसता सत्व वाढते
रुसता तुज लागे जगण्यास एकटे ! १४

गीतेचे हे रहस्य जाण नाम घे
बदल किती तनि मनि तव तू बघून घे ! १५

आसक्ती दु:खमूळ हट्टही नको
काम नको क्रोध नको द्वेषही नको ! १६

जे लाभे त्यात तोष हाव ना कधी
तो प्रसन्न कार्य करी जग म्हणे सुधी ! १७

कौशल्या लाव पणा कार्य करत जा
हरिपूजा तीच समज दंभ कर वजा ! १८

यश लाभे कधि अपयश हर्ष खेद ना
मन ज्याचे नित्य तृप्त तो रुचे जना ! १९

निर्मल मन, निर्मल तन मतिहि निर्मला
आत्मतृप्त हरिभक्ता जगति ना तुला ! २०

अभय मनी शक्ति तनी देत प्रार्थना
गीतामृत नित सेवी त्यास भ्रांति ना ! २१

आत्म्याचा कर विचार जाण तू स्वत:
तूच कृष्ण कृष्णहि तू उमज तत्वत: ! २२

कर्म करी सर्व हरि फलहि हरीला
हे कळले तोच जगी पूर्ण मोकळा ! २३

आत्मा हा जीव प्राण त्या विना कुडी
कोसळते भूमीवर दीन बापडी ! २४

जोवरती जीव आत शर्थ तू करी
तोवरती कार्य करुन म्हण हरी हरी ! २५

देव असे जरि न दिसे सुज्ञ जाणतो
नीति जगे त्या श्रीहरि ध्यानि भेटतो ! २६

जैसा मी तैसे जन जाणता खुला
प्रगतीचा मार्ग असा चालणे तुला ! २७

तूच राम तूच कृष्ण स्वस्वरूप ते
ओळख ही पटली तुज भाग्य समज ते ! २८

संतोषा नाव मोक्ष खूण स्वस्थता
बुद्धि शुद्ध तन हि स्वच्छ सहज अवस्था ! २९

मजवरती तेच प्रेम हरिवर जडता
व्यक्ति होय हरिमय ती हीच धन्यता ! ३०

हृदयी वसत घडवि कार्य सद्गुरु म्हणा
कर्म सुबक सुखद शुभद हटवि मीपणा ! ३१

बुद्धि शांत सम ठेवू घेऊ दक्षता
आत्मरूप देव बघत भाव तो स्वत: ! ३२

गीतेचे हे रहस्य टिळक सांगती
श्रीरामा कळत तसे शब्द बोलती ! ३३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले