सुधारक आणि केसरी यांच्यात अनेक प्रसंगी संघर्ष झडला – हल्ले प्रतिहल्ले झाले – आगरकर केवळ सुधारणावादी नव्हते – स्वराज्यवादीही होते तसेच टिळकांना सुधारणांचे वावडे नव्हते. किंबहुना संपूर्ण आगरकर त्यांच्या अनुयायांनाही पचनी पडणे कठिणच होते. एकेकाळच्या जिवश्च कंठश्च मित्रांची भांडणे पाहून काही सामान्य जन दु:खी कष्टी होत त्यांना उद्देशून आगरकर म्हणतात
--------------------------------------
विचारकलहा भिता कशाला? विचारकलहा भिता !
आत्मपरीक्षण खुल्या करतसे प्रगतीच्या वाटा ! ध्रु.
वाग्युद्धी जरी प्रहार झाले
फुलांपरी आम्हीच झेलले
तेजस्विनि ठिणग्या चमचमती चकमक की झडता १
बुद्धीची लावाच कसोटी
विकसित होवो व्यक्ती व्यक्ती
तर्क, पुरावे भूमिकेस या देती बळकटि अता २
रुग्णालागी पथ्य हवे
कटु हितकर नित वचन हवे
समाजचौकट जुनी फेकु करू विरोध लोकमता ३
कर्तव्यावर ठेवुनि निष्ठा
स्वजनांशीही लढू तत्त्वत:
मित्र तरीही न वैरि न कोणी वृथाच घाबरता ४
संघर्षातुन फुलते जीवन
देत चिकित्सा नवसंजीवन
स्वराज्य मिळण्यापूर्वी आणू राबविण्या पात्रता ५
रुढींचे तोडण्यास बंधन
खुशाल सत्ता करो नियंत्रण
समाजोन्नती होता घडते ध्येयांची पूर्तता ६
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३०.१.१९६८
No comments:
Post a Comment