Saturday, August 10, 2024

अभिमान दूर व्हावा - चरणी मिळो विसावा!

अभिमान दूर व्हावा -
चरणी मिळो विसावा!ध्रु. 

मन काही आवरेना 
क्षण स्वस्थ बैसवेना 
आधार तूच द्यावा!१ 

तव नाम आळवावे 
माझ्या मना कळावे 
पथ भक्तिचा दिसावा!२ 

कर्तेपणा न बाधो 
संयोग तुजशि साधो
सरु दे पुरा दुरावा!३ 

रचयिता :  श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३६१ (२६ डिसेंबर) वर आधारित काव्य.

जगात आजपर्यंत पुष्कळ लोकांनी दानधर्म स्वार्थत्याग केला पण त्यांच्यामध्ये कर्तेपणाची जाणीव राहिल्याने खऱ्या अर्थाने त्यांना निस्वार्थी बनता आले नाही. खरे म्हणजे आमचे मन आमचे ताब्यात आल्याशिवाय आम्हाला निस्वार्थी बनता येणार नाही. मन ताब्यात यायला सध्याच्या काळात नामस्मरणाशिवाय दुसरे साधनच नाही. ते मन स्वाधीन होण्यासाठी सर्वांनी मनापासून नाम घ्या. ह्या अभिमानासारखा आपला घात करणारा दुसरा शत्रू कोणी नसेल. तो अभिमान सोडायला आपण शिकले पाहिजे. तो अभिमान नाहीसा करण्यासाठी आपण कर्तेपणाची जाणीव सोडून नाम घेतले पाहिजे. नीतीच्या बंधनात राहणाऱ्या माणसाचे विकार आपोआप आवरले जातील. आपले मन भगवंताकडे विनम्र करा. तुम्ही भगवंताकडे जाऊ लागा, मन आपोआप तुमच्या मागे येईल कारण तो त्याचा धर्म आहे. भगवंताला विसरू नका. तुमचे मन तुम्हाला आपण होऊन सहाय्य करेल याची खात्री बाळगा.

No comments:

Post a Comment