Saturday, August 24, 2024

प्रतिक्षण सार्थकि लावावा!

भरवसा न घडिचा, प्रतिक्षण सार्थकि  लावावा!ध्रु.

मी भगवंताचा, दुरावा इथे न कामाचा! 
राम एक माझा, असे मी नित्यचि रामाचा 
अहंभाव सगळा दयाळा समूळ निपटावा!१ 

शरण तया जावे, दुःख निज रामा सांगावे 
गायनि त्या गावे चरण ते कधी न सोडावे 
प्रपंच जर नेटका, तरी तो भावतसे राघवा!२

इच्छा रामाची, तिजपुढे मात्रा कोणाची? 
सृष्टी देवाची, खरोखर जगन्नियंत्याची
मीपण सकल सरे, जागृती येताक्षणि जीवा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १६९ (१७ जून) वर आधारित काव्य.

वाईट लोकांस सुधारणे हेच खरे कार्य आहे आणि तेच समर्थांनी केले. समर्थांनी सर्व जगाचा स्वार्थ पाहिला. प्रपंच सावधानपणे पण दक्षतेने करावा असे त्यांचे म्हणणे असे. प्रपंचात जर समाधान झाले नाही तर तो नेटका नाही झाला. प्रपंचाचे बंधन सुटावे लागते, जबरदस्तीने सोडून कुठे सोडता येते. पेन्शन घेतल्यावर परमार्थ करू हे म्हणणे बरोबर नाही. या गडबडीतच प्रपंचाच्या झटापटीतच परमार्थ साधावा. आपण विषयांना जसे शरण गेलो तसे भगवंताला शरण जावे. नोकरीत नाही का तुम्ही वरिष्ठाला शरण जाता मग जे पोटाकरिता करता ते भगवंताकरता का नाही करीत? सर्वात सोपे भगवंताला शरण जाणे आहे. त्याला निराळ्या कोणत्याही वस्तूची जरुरी नाही लागत. माझ्या मनात येईल तेव्हा भगवंतास शरण जाता येईल. भगवंतास शरण जाणे म्हणजे, मी त्याचा झालो असे म्हणणेच होय. मी रामाचा झालो; जे जे होते ते रामइच्छेने होते असे जो म्हणतो त्याला निराळी सावधगिरी ठेवावी लागत नाही.

No comments:

Post a Comment