स्मरण राहो तव सदोदित केशवा, नारायणा!
मागणे माझे सरू दे हीच आता याचना!!ध्रु.
मागणे माझे सरू दे हीच आता याचना!!ध्रु.
तूच कर्ता तूच दाता
तूच भोक्ता तू विधाता
हे कळावे, हे ठसावे ही रुजू दे भावना!१
आपला म्हण, नुरवि मीपण
क्षुद्र जीवन, तुज समर्पण
सकल तूची सकल तूझे माझिया जगजीवना!२
तिमिर दाटे, रुतति काटे
भीति वाटे, कंठ दाटे
नामदीपक, तिमिरनाशक करि असू दे त्या क्षणा!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १४९ (२८ मे) वर आधारित हे काव्य.
संकटकाळी, हे संकट नसावे असे न वाटता परमेश्वराचे स्मरण असावे व त्याचे जवळ हे मागावे की देवा मला तुजजवळ काहीहि मागण्याची इच्छा देऊ नको. देहास मुद्दाम कष्ट देऊ नये, पण जेव्हा ते आपोआप येतात तेव्हा मात्र ते आनंदाने सोसावेत. प्रपंच मिथ्या मानावा व जो मिथ्या तो बरा असे वाटण्यात काय अर्थ? तुमचा परमार्थही तुमच्या स्वाधीन नाही, तो सद्गुरूच तुमच्याकरिता करत असतात. तेव्हा तुम्ही कशाचीही काळजी करू नये, जे होईल त्यात आनंद मानीत राहावे. प्रपंच देवाचा मानून अभिमानरहितपणे तो करणे हा परमार्थ. देवापाशी "मला तू आपला म्हण, मन तुझ्या चरणी अर्पण केले, मला तुजजवळ काहीहि मागण्याची इच्छा न होवो," असे मागावे. भगवंताची मनापासून प्रार्थना करावी, आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवतो. अंधारामध्ये वाट चालत असता एक क्षणभरच वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले असता पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते.
No comments:
Post a Comment