दोष देवासी देऊ नका!
चूक आपली झाकू नका!ध्रु.
चूक आपली झाकू नका!ध्रु.
प्रपंच का मानिता सुखाचा?
रामनाम नच घेई वाचा
खटपटीत जाता जन्म फुका!१
साध्य कोणते कळले नाही
साधन हाती धरले नाही
वासना कधी सुख देईल का?२
ओळखले ना 'कोण असे मी' ?
पाहिले न कधि अंतर्यामी
नश्वर देहा लागता धका!३
तृप्त न होते कधी वासना
रामाजवळी तिचा वास ना
कळुनिया अंतरी वळत न का?४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ८७ (२७ मार्च) वर आधारित काव्य.
प्रापंचिकाच्या मनात शंका येते की सन्मार्गाने गेला तरी माणूस दुःखी का होतो? मी देवाला भिऊन वागलो, का? तर प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून. देवाची एवढी खटपट करून जर सुखी होता येत नाही तर काय उपयोग? प्रपंचात दक्षता ठेवणे जरूर आहे. ते जर आपण केले नाही तर देवाने काय करावे! भगवंताचा साधन म्हणून आपण उपयोग करतो व शेवटी साधनालाच दोष देतो. साध्य बाजूला राहते. भगवंत विषय देईल पण त्याबरोबर त्याचे दुःखही देईल. मी कोण? हे जोवर आपण ओळखत नाही तोवर वैभवाच्या शिखरावर जरी गेलो तरी आपल्याला समाधान मिळणार नाही. देहच सत्य नाही तर त्यावर उभारलेली इमारत कुठून सत्य असणार? वासना मारायला भगवंताचे अधिष्ठान हाच एक उपाय आहे. वासना ही कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ ' वास ' ठेवला तरच ती नष्ट होते.
No comments:
Post a Comment