Thursday, August 15, 2024

विषय विसरावे, भगवंता हृदयि भरावे!

विषय विसरावे, भगवंता हृदयि भरावे!ध्रु.

अवीट असतो श्रीभगवंत 
नामि कोंडिती तयास संत 
नाम घोकावे, देवाचे व्हावे व्हावे!१ 

प्रपंच करु कर्तव्य म्हणून 
कमलपत्रसम अलिप्त राहुन 
संतसंगाने भवसिंधू तरुनी जावे!२

संते दिधला प्रभु आधारा 
भगवद्भक्ती देत निवारा 
असे बोलावे, जे झडकरि कृतीत यावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११६ (२५ एप्रिल) वर आधारित काव्य. 

आपले हृदय विषयांनी इतके भरले आहे की तिथे भगवंताच्या प्रेमाला जागाच राहिली नाही. या हृदयाचा संबंध भगवंताशी जोडण्यासाठी आपल्या हृदयातील सामान (म्हणजे विषय) खाली करून त्याच्या जागी भगवंताचे प्रेम भरणे जरूर आहे. जी वस्तु आपल्याला कितीही मिळाली तरी तिचा वीट येणार नाही अशी वस्तु आपण मिळवावी.  अशी वस्तु एकच आहे ती म्हणजे भगवंत होय. भगवंताने आपले नाम संतांस दिले. त्यामुळे संत जे करतील त्यास मान्यता देणे भगवंतास जरूरच आहे. संत हा जसे बोलतो तसे वागतो. आपण बोलतो चांगले आणि वागतो मात्र त्याच्या उलट. आपण सुख हवे असे म्हणतो आणि प्रपंच करतो म्हणून नेहमी दुःखाने रडतो. यासाठी आपण अशी कृती करू या की आपल्याला नंतर तसे बोलता येईल. मोठमोठ्या संतांनी प्रपंच केला खरा, परंतु तो सुखासाठी केला नाही. आपल्या वृत्तीपासून न ढळता इतरांना तारण्याचे काम संतांनी केले. संतांनी आपल्याला परमात्म्याचा आधार दिला. जो संताजवळ राहतो तोही संतच बनतो. काही कष्ट न करता परमार्थ साधणे हेच सत्संगतीचे महत्त्व आहे. ज्याचे चित्त आणि वित्त भगवंताकडे असते तोच खरा संत होय. संत हे आपला संबंध भगवंताशी जोडतात.

No comments:

Post a Comment