"गीत गणेशायन"
कवि : श्रीराम बाळकृष्ण आठवले
संगीतकार : मोहिनीराज ओंकार
नरांतक नि देवांतक दोघाही महाभयंकर दैत्यांचा अंत झाला. पृथ्वी आणि स्वर्ग येथे कोण आनंद झाला.
आर्यवर्तात परत अखंड गणराज्याची स्थापना झाली. काशीराजा हा झाला लोकपाल. सुरुवातीला या राज्यात विनायक आला होता उपाध्याय म्हणून. धर्मशास्त्रवेत्ता म्हणून. आपल्या बुद्धिमत्तेने, सामर्थ्याने तो विघ्नहर्ता झाला. किती दिवस झाले होते आई-वडिलांना सोडून.
कश्यप आणि अदिती यांना, माय पितरांना भेटायची ओढ लागून राहिली म्हणून निरोप घेताना महोत्कट नगरवासियांना म्हणाला -
स्मराल तेव्हा सन्निध आहे
का करिता चिंता?
येतो, निरोप द्या आता!ध्रु.
तात नि जननी सदनी असती
केव्हाचे ते वाट पाहती
निघणे याकरता !१
वडिला सुखवा, हीच अपेक्षा
सत्कार्याला कुठल्या कक्षा?
तनु झिजण्याकरिता!२
मोहाने आडवू नका मज
प्रेमाची हो जाण असे मज
कृतज्ञ याकरिता!३
माझी प्रतिमा घरी लावा हो
भाव आतला भरुनी पाहा हो
कृपा करा आता!४
स्वराज्य आले सुराज्य व्हावे
सुराज्य जगती अजेय व्हावे
जीवन याकरता!५
No comments:
Post a Comment