असो सुख असो दुःख, घडो तुझेच स्मरण
नच सुटावे राघवा तुझे कदापि चरण!ध्रु.
नच सुटावे राघवा तुझे कदापि चरण!ध्रु.
नाम तुझे घेऊ
शिर पदी ठेवू
तुज आळवीता रामा वाहु देत हे नयन!१
तुझा दास देवा
करी तुझी सेवा
तुझा विसर पडणे हाचि हाचि गा दुर्गुण!
चिंता मारी जनां
नाम तारी जनां
देहबुद्धी लोपण्यासी तुझे मांडले भजन!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३५३ (१८ डिसेंबर) वर आधारित काव्य.
संकटे देवाने आणली तर ती सोसण्याची शक्तीही तोच देतो. समर्थांचे होऊन असे भ्यावे का? प्रत्यक्ष संकटाचे निवारण जर करता येते तर मग भीती कशाची धरावी? खेळातली सोंगटी मेली म्हणजे त्याचे सुखदुःख कोणी करतो का? तसे व्यवहारात आपण वागावे. "परिस्थितीचा परिणाम माझ्या मनावर घडू देऊ नका देवा" असे म्हणावे ' परिस्थितीच बदल' असे देवास म्हणू नये. जे दुर्गुण भगवंताचा विसर पडायला कारण होतात त्या सर्वांचा संग्रह म्हणजे काळजी होय. ज्याला काळजी फार त्याच्या हृदयात आनंद जाऊच शकत नाही. देहबुद्धीमुळे आपल्याला काळजी लागते. वासना व अहंकार हे काळजीचे आईबाप आहेत. काळजी जितकी आपल्याला मारते तितकेच नाम आपल्याला तारते. काळजी करायचीच असेल तर अनुसंधान कसे टिकेल याची करा. नामाची काळजी घ्या म्हणजे काळजी करायचीच वेळ येणार नाही.
No comments:
Post a Comment