Tuesday, April 14, 2026

ऋणी असावे यासाठी, संत जागे करताती

ऋणी असावे यासाठी, संत जागे करताती!ध्रु. 

त्यांची तळमळ 
क्षाळितसे मळ 
चुकल्या पथिका मधुर बोलुनी पथावरी आणती!१

त्यांच्या लीला 
जग तरण्याला 
स्वार्थाचा लवलेश न चित्ती ते तर शुद्धमती!२

अनुभव बोले
हृदयी ठसले
संतांच्या आज्ञेचे पालन देही दे मुक्ती!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०५ (१४ एप्रिल) वर आधारित काव्य.

संगतीचा परिणाम नेहमी मनावर होतो; म्हणून चांगल्या विचाराच्या माणसांची संगत धरावी. आपल्याला आपल्या ध्येयाचा विसर पडला, परंतु संतांनी आपल्याला जागे केले. ते ज्या लीला करतात त्या जगाच्या कल्याणासाठी असतात. ते स्वस्थ बसलेले दिसले तरी जगाचे कल्याण करीतच असतात. ज्या संतांचा ग्रंथ आपण वाचतो, त्यांच्या कृपेवाचून तो नीट समजणार नाही. ज्याच्यावर त्यांची कृपा आहे, त्याला काही विद्वत्ता नसताना देखील त्या ग्रंथाचा बरोबर अर्थ अगदी स्वाभाविकपणे कळेल. संतांची आज्ञा पालन करणे म्हणजे संतसेवाच होय. सत्पुरुषांच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनविणे हा खरा सत्समागम आहे.
आपल्याला जीवनांतील ध्येयाचा विसर पडल्यामुळे संत आपल्याला जागे करतात.

No comments:

Post a Comment