Wednesday, April 15, 2026

सत्संगाचा लाभ मोठा! आनंदा ना तोटा!

सत्संगाचा लाभ मोठा! 
आनंदा ना तोटा!ध्रु.

मन द्रव्यांतरि गुंतत नाही 
ओढ हरीची लागुन राही 
गहिवर ये प्रभु स्मरता!१

सर्व गुणांचा सागर ईश्वर 
तो संतांचा बनतो किंकर 
अपार संत महत्ता!२ 

विकार विरती, विचार स्फुरती
हृदि पाजळती ज्ञानज्योती 
विश्व धवळले आता!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०६ (१५ एप्रिल) वर आधारित काव्य.

सत्संगतीच्या योगे मन पैक्यावर गुंतून राहात नाही. जे सुख चिरकाल टिकणारे नाही ते घेऊन काय करायचे? पैक्यासारख्या निर्जीव वस्तूत आपले मन किती गुंतून राहते! पैशाचे नाव अर्थ, पण तो करतो मोठा अनर्थ. पैसा प्रपंचाला पुरेसा असावा! म्हणजे किती तर पेन्शन असेल तर त्यांना रोजच्या निर्वाहापुरता असला म्हणजे पुरेसा झाला. आपल्याला अडचण नाही पडली, की आपली श्रीमंतीच आहे. पैशाच्या बाबतीत आपण प्रयत्न मात्र आग्रहाने करावा आणि नंतर होईल तसे होऊ द्यावे. आपण आतून निष्काम, निर्लोभ व निरिच्छ असावे. सत्संगती पासून सद्विचार व सद्वासना प्राप्त होतात. ज्याचे विचार चांगले तो मनुष्य खरा चांगला होय; व जिथे भगवंताचे अनुसंधान आहे तेथे राहणे हीच खरी सत्संगति होय.

No comments:

Post a Comment