देवाने जगात मुक्त हस्ताने सौंदर्य उधळलेलं आहे - सौंदर्याचा आस्वाद घ्यायला वेळ हवा. संसारी जिवांचे विश्व अगदी सीमित, बंदिस्त. संत म्हणतात - राहते घर सोडू नको पण शरीर - रूपी घरात मुळीच राहू नको.
आनंदसागरात मी ला बुडवून टाक. संसाराचे खोटे ओझे क्षणभर जरी दूर केले तरी कसं वाटतं सांगू? आवाजाचा स्टोव्ह बंद केल्यावर वाटत तसं.
तुझा देहभाव हरपण्यासाठी रोज फिरत जा. तू कोणी विशेष नाहीस हे पटेल.
अभ्यासाने तीन गुण नक्की ताब्यात ठेवता येतात.
*********
तिन्ही गुणांना लंघुनि जावे -
हरिमय हे जीवन व्हावे!ध्रु.
शरीर आहे तुरुंग मोठा
आत सुरक्षित भावच खोटा
मुक्त मनाने विहरावे!१
संसाराचे ओझे खोटे
न दिसे परि ते जाचक मोठे
दूर फेकुनी ते द्यावे!२
तुझ्याविना ना अडे कुणाचे
चंद्रसूर्य हे झळकायाचे
भजने मीपण विलयावे!३
रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
११.११.१९९३
माजघरातली ज्ञानेश्वरी या परमपूज्य ताई दामले यांच्या प्रवचनांवर आधारित कविता.
No comments:
Post a Comment