चित्तास करावे नामस्मरणी स्थिर!ध्रु.
नाम वदावे, स्वये श्रवावे
रामकीर्तनी रंगुनि जावे
ते नाम रुचो मुंगीस जशी साखर!१
कल्पनेत परमात्मा आणू
सगुण करूनी तयास वानू
मग उतावीळ ही चित्त होतसे धीर!२
सर्वाभूती ईश्वर दिसता
नुरेल थारा कसला द्वैता
ही समाधीच की आणिल नयनी नीर!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०५.०१.१९७४
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ५ (५ जानेवारी) वर आधारित काव्य.
नामस्मरण करताना चित्त एकाग्र का होत नाही? त्यासाठी काय करावे? विचार येतील तसे जातील, तिकडे लक्ष देऊ नये. नामस्मरण करीत असताना ते नाम आपल्या कानांनी ऐकावे, म्हणजे एकाग्रता होण्याला मदत होईल. मनुष्य अगदी एकटा असला तरी, अगर एकांतात असला तरी आपल्या कल्पनेने तो अनेक माणसे आपल्या भोवती गोळा करतो. कल्पना करायचीच तर ती भगवंताविषयी करू या. कल्पनेच्या पलीकडे असणारा परमात्मा आपण कल्पनेत आणून सगुण करावा व तेथेच आपले चित्त स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. विषयाची जितकी आवड आहे तितकीच देवाचे प्राप्तीबद्दलही आवड ठेवावी म्हणजे आपणास त्याचे ठिकाणी एकाग्र होता येईल. सर्वाभूती भगवद्भाव पाहणे हेच खरे एकाग्रतेचे साधन. सर्व ठिकाणी तोच भरलेला आहे असे समजल्यावर द्वैत कोठे राहिले? व जेथे द्वैत गेले तेथे आपोआप एकाग्रता आलीच. अशी एकाग्रता साधते तीच खरी समाधि होय.
No comments:
Post a Comment