Sunday, October 27, 2024

सारासार विचार, करी तूं सारासार विचार!

जय जय रघुवीर समर्थ!


सारासार विचार, करी तूं सारासार विचार!ध्रु.

मुळी कल्पना, कण हि सत्य ना
मृगजळासि ना उपाय तरणा 
विवेक करूनी मना माझिया वृत्ती त्वरित सुधार!१ 

शुद्ध आचरण, मधु संभाषण 
उभय सुसंगत, तें सद्‌वर्तन 
सुखदुःखें ही संसारांतुनि असत्य जाण त्रिवार !२ 

कल्पनेतुनी दुःख निर्मिती 
शुद्धज्ञाने लाभे शांती 
देहोऽहं ची फिटता भ्रांती शिवदर्शन घडणार !३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१०.१०.१९७४
खालील श्लोकावर आधारित काव्य


विवेकें क्रिया आपुली पालटावी। 
अती आदरें शुद्ध क्रीया धरावी । 
जनीं बोलण्यासारिखें चाल बापा। 
मना कल्पना सोडि संसार तापा ।।

विवेकाने आपली वागणूक सुधारावी. अत्यादराने शुद्ध आचरण ठेवावे. समाजामध्ये बोलण्यासारखे चालावे. हे मना, केवळ कल्पनेतून निर्माण झालेला संसारताप सोडून दे.

No comments:

Post a Comment