शारीरिक रोग बरा होण्यासाठी औषधाइतकीच मनःस्वास्थ्याची सुद्धा आवश्यकता आहे. संत हेच खरे डॉक्टर आहेत, ते भवरोगाचे जाणकार आहेत.
माझा सर्वात जवळचा व कधीही त्याग न करणारा चैतन्यघन प्रभू आहे.
सतत नामात रंगून राहिलो तर जिवाला दिलासा मिळतो, परमेश्वरावरील श्रद्धा दृढ होत जाते. देव होऊन देवाची भक्ती करायला हवी. जो जीवन प्रकाशित करतो तो देव.
विवेकाने मनाचा तोल सावरला जातो. भक्ती ही कृती नसून ती वृत्ती आहे.
*******
मन करा रे प्रसन्न - आत येतो नारायण
संत घालतात प्रेमे नामामृताचे भोजन!ध्रु.
नाम जो जो कोणी घेतो त्याचा भवरोग जातो
जेथे जेथे तो पाहतो तेथे विठ्ठल दिसतो
नाम मनालागी स्नान!१
पहा आपल्या डोळ्यांनी देह चालला झिजूनी
न ये ऐकता कानांनी गोड गाणी गोड वाणी
ठेवा अनंताचे भान!२
संतसंग दे गा सदा ऐसे विठ्ठलासी वदा
कधी देवाला ना निंदा करा स्वहिताचा धंदा
हरी करील कल्याण!३
संत नामांकित वैद्य भक्तिवैराग्याचे पथ्य
रामनाम हेच सत्य येता जाता घ्यावे नित्य
पहा औषध घेऊन! ४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(माजघरातली ज्ञानेश्वरी या परमपूज्य ताई दामले यांच्या प्रवचनांवर आधारित काव्य).
No comments:
Post a Comment